महांतेश चरंतीमठ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पुरस्कार वितरण
पिंपरी : सुसंस्कृत जीवन जगायचे असेल तर गुरुंनी दाखविलेल्या मार्गाचे आचरण करावे. संघर्षाला, प्रयत्नांना कठीण परिश्रमांची, कर्माची साथ दिल्यास यशाचे शिखर गाठता येते. स्वभावात नम्रता असावी, नम्रपणाकडे दुर्लक्ष करुन मी पणाचा गर्व केला तर -हास होईल. असे मार्गदर्शन श्रीमद् श्रीशैल्य सुर्यसिंहासनाधिश्वर महास्वामीजी श्री श्री श्री 1008 जगदगुरु डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य यांनी केले.
महांतेश चरंतीमठ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रविवारी प्राधिकरण मोशी परिसरात जगद्गुरु डॉ. शिवाचार्य यांच्या हस्ते विविध क्षेत्रात कार्य करणा-या व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये कर्नाटकातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ नेते शंकर गौडा-पाटील, ओमप्रकाश दादाप्पा कोयटे (सामाजिक सहकार), अशोक रुकारी (सामाजिक, पुणे), महेश कुगांवकर (सामाजिक पुणे), सुरेश वाळके (सामाजिक, पिंपरी-चिंचवड), कुमार करजगी (शैक्षणिक, सोलापूर), वैजनाथ स्वामी (पत्रकार नांदेड), सोमनिंगा जिवाणाकर (धार्मिक बिळूर), शंकर गौडा कोटीकाने (शेती विजयपूर), मृत्यूंजय हिरेमठ (उद्योजक पिंपरी चिंचवड), बसवराज चौकीमठ (सामाजिक विजयपूर) आदींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर महांतेश चरंतीमठ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष गुरुराज चरंतीमठ, ष. ब्र. 108 रेणुक शिवाचार्य स्वामीजी हिरेमठ (मंद्रुपकर), श्री.ष.ब्र. 108 शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी हिरेमठ (बेळंकीकर), श्री.ष.ब्र. 108 डॉ. धर्मरत्न मल्लिकार्जून शिवाचार्य स्वामीजी (होटगीकर), श्री.ष.ब्र. 108 महादेव शिवाचार्य स्वामीजी हिरेमठ (वाईकर) आणि वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोक मल्लया स्वामी, नाशिक विभागीय महसूल उपायुक्त दिलीप विरूपाक्ष स्वामी प्रमुख पाहुणे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, कार्याध्यक्ष आण्णाराय बिरादार, स्वागताध्यक्ष शिवाजी साखरे, संयोजक राचय्या चरंतीमठ, सुत्रसंचालक राजेंद कोरे उपस्थित होते.
जगदगुरु डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, यशस्वी, सत्कारार्थी व्यक्तींना मिळालेले बक्षिस, शाल, श्रीफळ, पगडी, स्मृतीचिन्ह इतरांना आकर्षित करतात. पुरस्कार इच्छेमुळे मिळत नाहीत, तर काहीतरी वेगळे करुन दाखविण्याची जिद्द असावी लागते. यशस्वी व्यक्तींना तो पल्ला गाठण्यासाठी केलेले परिश्रम, संयम आणि गुरुंच्या मार्गदर्शनामुळे ते साध्य झाले. त्यामुळे संघर्षमय जीवनात प्रत्येकाने आपल्या स्वभावात नम्रता ठेवावी. ‘मी’ पणा, अहंकार सोडून संयम ठेवावा यश नक्कीच मिळेल असेहि महास्वामी म्हणाले.
शनिवारी महास्वामींची कुंभकलशासह मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणूकीत 501 महिला मंगल कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. यानतंर अभिषेक विद्यालय येथे श्रीमद् श्रीशैल्य सुर्यसिंहासनाधिश्वर महास्वामीजी श्री श्री श्री 1008 जगदगुरु डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी श्री शैल्य महापीठ यांचे दर्शन, अनुग्रह, दीक्षाविधी, अय्याचार (व्रतबंध), सामुहिक ईष्टलिंगपूजा, दिक्षाविधी आदी कार्यक्रम झाले. कार्यक्रमाच्या व्यवस्थापनात श्री मल्लिकार्जून प्रतिष्ठान, प्राधिकरण, पिंपरी चिंचवड जंगम समाज, श्री संत गवरशेठ लिंगायत वाणी समाधी प्रतिष्ठान सुदूंबरे, वीरशैव लिंगायत समाज आदी संस्थांनी भाग घेतला होता. स्वागत ट्रस्टचे अध्यक्ष गुरुराज चरंतीमठ, सुत्रसंचालन राजेंद्र कोरे आणि आभार शिवाजी साखरे यांनी मानले.