Chaupher News
पुणे : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरुद्ध बहुजन क्रांती मोर्चा, ट्रेड युनियन्स आणि विविध संघटनातर्फे आज, बुधवारी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि ईव्हीएमला विरोध करण्यासाठी या बंदचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यात भारत बंद दरम्यान निदर्शने करणाऱ्या 200 हुन अधिक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
या बंदला प्रामुख्याने मुस्लिम संघटनांचा पाठिंबा असून या बंदवर केंद्रीय गृहमंत्रालयाने विशेष लक्ष घातले आहे. दरम्यान, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने बंदला विरोध केला आहे. या बंदमुळे व्यापारी, उद्योजक, दुकानदार सर्वजण आपापले व्यापार व उद्योग बंद ठेवून सहभागी होतात. त्यामुळे नुकसान होऊन ग्राहकांचे हाल होतात. त्यामुळे यापुढे विविध राजकीय पक्ष, संघटना यांनी पुकारलेल्या बंदमध्ये आपापले व्यापार, व्यवसाय बंद न ठेवता काळ्या फिती लावून सहभागी होऊन सहकार्य करतील, अशी घोषणा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चरने केली आहे.