Chaupher News
पिंपरी : पवना नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचली असून डासांच्या उत्पत्तीमुळे नदीकिनारील भागात साथीच्या आजारांत वाढ झाली आहे. तसेच प्रदूषण व जलपर्णीमुळे नदीतील मासे व इतर जलचर मृत पावणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. त्यासाठी नदीपात्र जलपर्णीमुक्त करण्याची गरज आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने तात्काळ नदीपात्रातील जलपर्णी तत्काळ काढून अहवाल पाठवावा, असा आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) दिला आहे.
पिंपरी-चिंचवडकर ज्या पवनामाईचे पाणी पितात तीच पवनामाई जलपर्णीच्या विळख्यात अडकली आहे. त्याची पाहणी करुन कारवाई करण्याची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी ‘एमपीसीबी’कडे केली होती. त्यानुसार ‘एमपीसीबी’चे उपप्रादेशिक अधिकारी किरण हसबनीस यांनी पवना नदीची पाहणी केली. त्यानंतर तत्काळ जलपर्णी काढावी. त्याचा अहवाल पाठविण्यात यावे असे आदेश त्यांनी पिंपरी महापालिकेला दिले आहेत.
पवना नदीमध्ये भरमसाठ जलपर्णी साचली आहे. हवामान बदलामुळे तापमानात मोठी वाढ झाली आहे. यामुळे डासांच्या उत्पत्तीमध्ये वाढ होऊन डेंग्यू सारख्या साथीच्या आजारांची वाढ नदीकिनारील रावेत, पुनावळे, वाल्हेकरवाडी, ताथवडे, चिंचवड, थेरगाव, रहाटणी, काळेवाडी, पिंपळेसौदागर, पिंपळे गुरव, सांगवी, दापोडी भागात झालेली आहे. त्यामुळे तत्काळ जलपर्णी काढण्याबाबत कार्यवाही करावी. जेणेकरुन डासांची उत्पत्ती थांबेल. भविष्यात वाढलेले जलपर्णीमुळे पाण्यातील प्राणवायुचे प्रमाण कमी होऊन मासे मृतकी होणार नाहीत.
तसेच महापालिका क्षेत्रात निर्माण होणारे संपुर्ण घरगुती सांडपाणी एकत्र करुन त्यावर योग्य ती उपाययोना करावी. त्याची शास्त्रोक्तपणे विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. यावर योग्य ती कार्यवाही करावी. त्याचा अहवाल पाठविण्यात यावेत ‘एमपीसीबी’ने म्हटले आहे.