Chaupher News
एक से बढकर एक दिग्गजांनी आपल्या बहारदार रचना तहत, तरन्नुम मध्ये सादर केल्या. सुंदर आवाज, दमदार सादरीकरण व गझलियतभरे, रवायती, गंभीर, हसऱ्या, विचार करायला लावणाऱ्या, अगदी गझलेच्या मोहमयी सागरात मनसोक्त डुंबायला लावणाऱ्या कधी खोल खोल तळाला तर कधी उंचच उंच नभामध्ये मुक्त विहार करून मनसोक्त आनंद देणाऱ्या रचना मन भावून गेल्या. गझलेचे विविध रंग उधळले गेले . मराठी गझल प्रांतातला हा महाराष्ट्रातील पहिला व अनोखा प्रयोग सुरळीत पार पडला. पैस रंगमंच चिंचवड येथे शनिवारी रात्री बरोबर 10:30 वा गझलरजनीस प्रारंभ झाला.
कार्यक्रमाच्या आरंभी जेष्ठ उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आणि रोटरी क्लब, चिंचवड चे अध्यक्ष श्री. बाळकृष्ण खंडागळे यांच्या हस्ते शमा प्रज्वलित करण्यात आली. प्रास्ताविक करत असताना दिनेश भोसले यांनी सार्वकालिक महान उर्दू गझलकार मिर्झा गालिब व गझलसम्राट सुरेश भट यांच्या गझल वाचनाने प्रारंभ केल्यानंतर खऱ्या अर्थाने मैफिलीस प्रारंभ झाला.
गझलरजनी हा रात्रभर चालणारा अनौपचारीक गझलसादरीकरणाचा आगळावेगळा उपक्रम राबविला आणि जवळपास ४० गझलकारांच्या उपस्थितीत व त्यांच्या उत्कृष्ट गझलांच्या सादरीकरणाने तो यशस्वीही झाला. संपूर्ण रात्रभर गझलमय वातावरणाने सर्वजण भारून गेले होते.
जेष्ठ गझलकार प्रमोद दादा खराडे(पुणे), आनंद पेंढारकर (मुंबई), यांच्यासह संवेदना प्रकाशनचे प्रकाशक नितिनजी हिरवे, प्रसिद्ध व्याख्याते राजेंद्रजी घावटे, तसेच गझलकारा उर्मिलाजी बांदिवडेकर (मुंबई), व डॉ. शरयूजी शहा (मुंबई), अशा जेष्ठांच्या तसेच सिद्धार्थ वाघमारे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
सुनिती लिमये, मृणाल घाटे, कविता काळे या गोड गळ्यांनी तरन्नूममध्ये रंग भरला. तसेच गझल मंथन सुमुहाचे संचालक अनिल कांबळे, (पनवेल). समरसता पिंपरी चिंचवड चे कैलास भैरट, स्वाती यादव (पुणे), अभिजीत दाते(मुंबई), जयंत कुळकर्णी (डोंबिवली), डॉ. जितेन्द्र पेंढारकर (मुंबई) उर्मिला वाणी (पुणे), वर्षा कुलकर्णी (पुणे), योगेश वैद्य(चेंबूर), हेमंत राजाराम (डोंबिवली), रुपेंद्र कदम (सांगली) मोहन गोखले, डॉ. रेखा देशमुख (पुणे), प्रकाश बनसोडे, जीवन धेंडे (बार्शी), नवनाथ खरात (करमाळा),विशाल राजगुरू, (मुंबई), संदीप मर्ढेकर(डोंबिवली)
सर्वांनीच एकाहून एक दर्जेदार गझला सादर केल्या.
कार्यक्रमादरम्यान गझलसादरीकरणाच्या चार फेर्या झाल्या. पहाटे 5:00 वाजेपर्यंत मैफिल रंगली.
परिपूर्ण कार्यक्रम, उत्तम नियोजन आणि वेळेचं बंधन पाळण्याबाबत आणि एक अतिशय दर्जेदार कार्यक्रम यशस्वी पद्धतीने आयोजित केल्याबद्दल पुन्हा एकदा महाराष्ट्रभरातून गझलपुष्पवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
इथून पुढे दरवर्षी गझलरजनी आयोजित होणार असल्याचे गझलपुष्प समुहाच्या वतीने दिनेश भोसले यांनी घोषित केले. तर आयोजनामध्ये अभिजीत काळे, प्रशांत पोरे, संदीप जाधव, तुकाराम पाटील, रघुनाथ पाटील, नंदकुमार मुरडे, महेश खुडे, बी एस बनसोडे, मीना शिंदे यांनी सहभाग नोंदवला.