Chaupher News
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस अपेक्षेप्रमाणे सावरकरांच्या मुद्द्यावरुन तापलं. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विरोधी पक्षाने मांडलेला गौरव प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी फेटाळला. त्यानतंर विरोधकांनी सभागृहात निषेधाचे फलक झळकावत घोषणा दिल्या. यानंतर गौरव प्रस्तावाच्या मुद्द्यावर भाजप आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. ‘सामन्यात खूप, विधीमंडळात चूप’ अशा घोषणा यावेळी आमदारांनी दिल्या. तसंच सावरकर यांचा गौरव करायला शिवसेनेला लाज वाटते का? असा सवालही फडणवीसांनी विचाारला.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे मागणी केली. मग त्यांच्या गौरव ठरावाला सरकार विरोध करणार का, असा उलट प्रश्नही फडणवीसांनी सरकारला केला.
दरम्यान, विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर भाजप आमदारांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा ठेवली आणि त्यांना आदरांजली वाहिली. सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त आज सरकारकडून प्रतिमा ठेवण्यात आली नव्हती.
दुसरीकडे सावरकरांच्या स्मृतिदिनानिमित्त मुंबईत पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने या यात्रेचं आयोजन करण्यात आलं. बाबाराव चौकातून या यात्रेला सुरुवात झाली.