चौफेर न्यूज – करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. मंगळवारी लॉकडाउनचा पहिला टप्पा पूर्ण झाला. त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना लॉकडाउनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणात लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात सरकारकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचं कठोर पालन करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून यासंबंधित तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे आज जाहीर करण्यात आली आहेत.
लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यासाठी जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी चेहरा झाकणे म्हणजे मास्क घालणे बंधनकारक केलं आहे. आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शकतत्वांनुसार सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. कुठल्याही संस्थेने किंवा सार्वजनिक ठिकाणच्या व्यवस्थापकाने पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्याची परवानगी देऊ नये. लग्न आणि अंत्यसंस्कार अशावेळी जास्त लोक एकत्र येणार नाहीत, यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्याने नियमन करावे. सार्वजनिक ठिकाणी थुकणाऱ्यांवर दंड आकारण्यात यावा. दारु, गुटखा, तंबाखूची विक्री बंद ठेवण्यात यावी यासह अनेक महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. सरकारच्या या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी ही ज्या क्षेत्रांमध्ये नियम शिथिल केले आहेत त्याच क्षेत्रांमध्ये केली जाईल. 20 एप्रिलपर्यंत अशा क्षेत्रांना निवडलं जाईल. ज्या ठिकाणी कोरोना हॉटस्पॉट नाही किंवा कोरोना हॉटस्पॉट बनण्याची शक्यता नाही अशा विभागात ही सवलत दिली जाणार आहे.