चौफेर न्यूज – कोरोनच्या प्रादुर्भावामुळे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने आता प्रवेश प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. सरकारने २०२०-२१ मध्ये या बदललेल्या नियमांना मान्यता दिली आहे. या नियमांमध्ये आयआयटी च्या प्रवेशासाठी ७५% गुण आवश्यक असणारी अट आता नसणार आहे. केवळ उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही आयआयटी मध्ये प्रवेश घेता येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये दिलासादायक वातावरण पाहायला मिळते आहे.
आयआयटी प्रवेशाच्या नियमात बदल करण्याचा निर्णय संयुक्त प्रवेश बोर्ड आणि आयआयटीने घेतला असल्याचे मानव संसाधन मंत्री रमेश पोखरीयाल यांनी जाहीर केले आहे. कोरोनामुळे बऱ्याच बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. त्यामुळे आयआयटीमध्ये जेईई ऍडव्हान्स परीक्षेत पास होण्याव्यतिरिक्त १२वीत कमीत कमी ७५% गुण मिळणे गरजेचे होते किंवा पात्रता परीक्षेत २०% निकष लावले जात होते. मात्र आता जेईई ऍडव्हान्स २०२० परीक्षा पास झालेल्याना सूट देण्यात आली आहे. त्यामुळे आता केवळ पास झालेल्या विद्यार्थ्यांनाही आयआयटी मध्ये प्रवेश मिळणार आहे.
आता विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी टक्केवारीची कोणतीच अट नाही आहे. याआधी जेईई ऍडव्हान्स परीक्षेतील अभ्यासक्रम कमी करणे आणि प्रवेश परीक्षा नियम बदलण्याची चर्चा सुरु होती. बोर्डाची परीक्षा रद्द झाल्याने बरेच हुशार विद्यार्थी नाराज झाले होते. चांगली कामगिरी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतलेली असताना परीक्षा रद्द झाल्याने त्यांचा हिरमोड झाला होता. कोरोनामुळे आतापर्यंत न झालेल्या परीक्षा आता १ ते ६ सप्टेंबर दरम्यान होणार आहेत.