चौफेर न्यूज – देशात आणि राज्यात दिवसागणिक कोरोना फैलावत आहे. मुंबईत स्थिती नियंत्रणात येत असली, तरी १ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्यास ९७ टक्के पालकांनी विरोध केला आहे. मुंबईत शाळा सुरु करण्याबाबत पाहणी जरी झाली असली, तरी राज्यातील महानगरांतील पालकांची हीच भूमिका असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. केवळ शहरच नव्हे तर भोवतालचा २० किमीचा परिसर शंभर टक्के कोरोनामुक्त झाल्यानंतर २१ दिवसांनी शाळा सुरू कराव्यात, असं बहुसंख्य पालकांचं मत आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शाळा सुरू करण्याबाबत घेतलेल्या आढाव्यानंतर महाराष्ट्राबाबत मात्र अद्याप निर्णय घेतला नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
देशात ऑनलाईन सर्वेक्षण करणाऱ्या लोकल सर्कल या प्रथितयश संस्थेने पालकांची शाळा सुरु करण्याबाबतची भूमिका जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केलं. त्यात शाळांमधील नियमित पद्धतीचं शिक्षण कधी सुरू करावं? या प्रश्नावर पालकांनी आक्रमक प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. शहरांतील १० हजार ५०० पालकांनी मत नोंदविले असून त्यात ६१ टक्के पुरुष आणि ३९ टक्के महिलांचा समावेश आहे
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला. यामुळे शाळाही बंद आहेत. पुनश्च: हरिओम म्हणत लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करत अनलॉकची प्रक्रिया राज्य सरकारने सुरु केली आहे. राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये गेल्या महिनाभरात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही तेथे शाळा सुरू करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने जारी केल्या आहेत. मात्र, मुंबईसह विविध महानगरांत शाळा सुरू करण्याबाबत चाचपणी सुरू आहे. मुंबईतील स्थिती नियंत्रणात येत असली, तरी महानगरांत रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे कोरोनाची दहशत कायम असून या संकटकाळात शाळा सुरू करण्यास पालकांचा स्पष्ट विरोध आहे.
.ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू झालं आहे का? या प्रश्नावर ७० टक्के पालकांनी हो, हे शिक्षण सुरळीत पद्धतीने सुरू असल्याचं उत्तर दिलं आहे. तर, २३ टक्के पालकांनी शिक्षण सुरू झालं आहे, मात्र त्यात अडथळे येत असल्याचं सांगितलं. ७ टक्के पालक अद्याप या शिक्षणाच्या प्रतीक्षेत आहेत.