चौफेर न्यूज – कोरोणा पार्श्वभूमीवर सध्या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम सुरु आहे. शाळा व महाविद्यालये कधी सुरु होणार याबाबत अद्यापही अनिश्चितता आहे. त्यामुळे विज्युक्टाचे अध्यक्ष डॉ. अविनाश बोर्डे यांनी ‘ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादा व शाळेत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिकवण्याचा कालावधी लक्षात घेता राज्य शिक्षण मंडळाने तातडीने दहावी व बारावीचा अभ्यासक्रम कमी करावा’, अशी मागणी शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे. तसेच याचे निवेदनही शिक्षणमंत्र्यांना देण्यात आले आहे.
राज्यात करोनाचे संकट सुरु झाल्यापासून शाळा व महाविद्यालये बंद करण्यात आली.त्यानंतर बदलत्या युगाप्रमाणे ऑनलाईन पद्धत शिक्षणासाठी वापरण्याचे ठरले. आता त्याचा सर्रास अवलंब होत असला तरीही विद्यार्थ्यांकडे असलेला सुविधांचा असणारा अभाव या मार्गातील सर्वात मोठी अडचण आहे. ऑनलाइनच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येणे कठीण आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अध्यापन करण्याचा कालावधी किती मिळेल हे आजही निश्चिात नाही. अशा परिस्थितीत वर्ग नववी ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम ३० टक्के कमी करण्याचा निर्णय केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे.