चौफेर न्यूज – परदेश शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी त्याच शाखेतून पदवी घेण्याबाबत असलेले बंधन शिथिल करण्यात आले आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात ट्विटरवरुन माहिती दिली.
ज्या शाखेतील पदवी आहे, त्याच शाखेचे पदव्युत्तर पदवी शिक्षण घेत असाल, तरच परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल, हा भाजप सरकारच्या काळात घेण्यात आलेला निर्णय धनंजय मुंडेंनी मागे घेतला.
एखाद्या विद्यार्थ्यांने आधी घेतलेले पदवी शिक्षण एका शाखेचे असले आणि परदेशी विद्यापीठात त्याला दुसऱ्या शाखेत पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घ्यायचा असेल, तरी त्याला परदेश शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे.
परदेश शिष्यवृत्तीसाठी ज्या शाखेत पदव्युत्तर प्रवेश त्याच शाखेचे पदवी शिक्षण अनिवार्य’ हा नियम आता रद्द करण्यात आला आहे. नव्या नियमानुसार परदेशी विद्यापीठाने एखाद्या विद्यार्थ्याला विशिष्ट पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश दिला असेल व त्याचे पदवी शिक्षण अन्य शाखेतून पूर्ण असेल तरीही त्याला परदेश शिष्यवृत्तीचा लाभ मिळवता येणार आहे, असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं.