चौफेर न्यूज – आपल्या मुलांच्या आणि पाल्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबत हवालदिल झालेल्या पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवलेल्या देशभरातील शाळा पुन्हा एकदा सुरु करण्याचा (Unlock 3) केंद्र सरकारचा विचार आहे. १ सप्टेंबर ते १४ सप्टेंबरदरम्यान टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्याचा केंद्राचा विचार आहे. ३१ ऑगस्ट रोजी लॉकडाउन संपल्यानंतर केंद्र सरकारकडून निर्बंध शिथील करत नव्या गाइडलाइन्स प्रसिद्द केल्या जातील. 1 सप्टेंबर ते 14 सप्टेंबरदरम्यान केंद्र सरकारकडून टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्याचा विचार केला जात आहे. यासंदर्भात आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या बैठकीत चर्चा झाली आहे. शाळांना सकाळी 8 ते 11 आणि 12 ते 3 अशा दोन शिफ्ट कामकाजासाठी दिल्या जाऊ शकतात. मध्ये 1 तास हा शाळा सॅनिटाइज करण्यासाठी असेल. 10 आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना पहिल्या 15 दिवसांमध्ये शाळेत उपस्थित राहण्यास सांगितलं जाऊ शकतं. नंतर सहावी ते नववीचे वर्ग सुरु केले जाण्याची शक्यता आहे. एकाच दिवशी एका इयत्तेतील सर्व तुकड्यांना शाळेत बोलावलं जाणार नसून प्रत्येक तुकडीला दिवस ठरवून दिला जाऊ शकतो. दरम्यान, 31 ऑगस्टनंतर अनलॉकच्या नव्या गाईडलाईन्समध्ये शाळा पुन्हा सुरु करण्याविषयी घोषणा केली जाऊ शकते. मात्र विद्यार्थ्यांना शाळेत केव्हा आणि कसं आणायचं हा निर्णय सर्वस्वी राज्यांच्या हातात असणार आहे.