चौफेर न्यूज – राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत हे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी देखील संवाद साधला. राज्यात कोरोना महामारीनंतर निर्माण झालेली भयंकर परिस्थिती सद्या आटोक्यात असल्याचे दिसून येत आहे. नववी ते बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरु झाल्यानंतर आता पाचवी ते आठवीच्या वर्गांच्या देखील शाळा सुरु करण्याचे घोषित करण्यात आले आहे.
दुसरीकडे उच्च शिक्षणाचे महाविद्यालये कधी सुरु होणार ? याबाबत कोणतीही स्पष्ट नसल्याचे दिसून येत आहे. महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय हा २० जानेवारीपर्यंत घेतला जाईल असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले होते. मात्र, अद्यापही याबाबत काही घोषणा वा हालचाली सुरु नसल्याचे समोर येत आहे.
महाविद्यालये सुरु करण्यासोबतच विद्यापीठांच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा कधी व कशा होणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. अनेक विद्यार्थी हे परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात अशी मागणी करत आहेत. दरम्यान, याबाबत उदय सामंत यांनी भाष्य केलं आहे.
‘कोविड पूर्णतः जात नाही तोपर्यंत ऑनलाइनच परीक्षा घेतल्या जातील’, असं ते म्हणाले आहेत. तर, महाविद्यालये सुरु करण्याबाबत देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘महाविद्यालय कधी सुरू होणार हाच प्रश्न सगळीकडे विचारला जातोय. आम्ही विद्यापीठाना सांगूनच हा निर्णय लवकर घेऊ. मात्र, कोविडच्या दृष्टीने निर्णय घ्यावा लागतोय.’ असं ते म्हणाले आहेत.