चौफेर न्यूज – महाराष्ट्र शासनाने राज्यात पाचवी ते आठवी पर्यंतचे वर्ग शाळेत भरवण्याचा निर्णय घेतला. याआधी २३ नोव्हेंबर पासून राज्यात नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग शाळा वा ज्युनिअर कॉलेज येथे सुरू झाले आहेत.
कोविड प्रोटोकॉलचे पालन करत शाळा सुरू आहे. सकाळी ११ ते २ या वेळेत शाळेचे वर्ग भरले होते. ज्या पालकांनी लेखी संमती दिली त्यांच्याच मुलांना शाळेत प्रवेश देण्यात आला. इतर मुलांसाठी व्हिडीओ कॉन्फरन्स पद्धतीने वर्ग सुरू होता.
आतापर्यंत महाराष्ट्रात नववी ते बारावी पर्यंतच्या २२ हजार २०४ पैकी २१ हजार २८७ शाळा सुरू झाल्या आहेत. राज्यात नववी ते बारावी पर्यंतच्या वर्गात शिकणाऱ्या ५६ लाख ४८ हजार विद्यार्थ्यांपैकी २२ लाख विद्यार्थी शाळेत असतात इतर मुले व्हिडीओ कॉन्फरन्स पद्धतीने शिकत आहेत. एकाचवेळी वर्गात तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुलांना शिकवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
मोठ्या मुलांच्या शाळांचा कारभार सुरू झाल्यानंतर आता राज्यात पाचवी ते आठवी पर्यंतच्या वर्गांची शाळा सुरू झाली. राज्यात पाचवी ते आठवी पर्यंतचे वर्ग असलेल्या १ लाख ६ हजार ४९१ शाळा आहेत. या शाळांतून ७८ लाख ४७ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या मुलांची शाळाही नववी ते बारावी पर्यंतच्या वर्गांच्या पद्धतीनेच कोविड प्रोटोकॉलचे पालन करत सुरू झाली आहे. सकाळी ११ ते २ या वेळेत शाळेचे वर्ग झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शाळेबाहेर पडण्याचे बंधन आहे. विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली तर पाचवी ते दहावीचे वर्ग सकाळी ९ ते दुपारी १२ अथवा सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत घेण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू आहे.
ज्या मुलांची तब्येत बरी नाही त्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार नाही. तसेच तब्येत बिघडल्यास तातडीने वैद्यकीय मदत देण्याची व्यवस्था असेल. विद्यार्थ्यांना, शिक्षकांना तसेच शाळेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना मास्क घालण्याचे बंधन आहे. शाळेत प्रवेश करताना सॅनिटायझरने हात स्वच्छ करण्याचेही बंधन लागू आहे. वर्गात सोशल डिस्टंस राखण्यासाठी आवश्यक ते उपाय करण्याच्या सूचना शिक्षण मंत्र्यांनी दिल्या आहेत.
महाराष्ट्रात शाळा ३० एप्रिल पर्यंत चालवल्या जातील. परीक्षांबाबत योग्य वेळी योग्य ते आदेश जाहीर केले जातील. दहावी आणि बारावीच्या मुलांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.