चौफेर न्यूज – महाविद्यालयीन प्रवेशावेळी घेण्यात आलेली अनामत रक्कम अथवा सुरक्षा ठेव रक्कम काही महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना परत केली नसल्याच्या तक्रारी विद्यापीठाकडे आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ही रक्कम परत करण्याचे आदेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयांना दिले आहेत.
राज्यातील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या वेळी अनामत रक्कम घेतली जाते. ही रक्कम अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना दिली जाते. मात्र, विद्यार्थ्यांनी अनामत रक्कम परत करण्याची मागणी न केल्यास ही रक्कम महाविद्यालयाकडे जमा असते. विद्यार्थ्यांनी मागणी केल्यानंतर काही महाविद्यालयांकडून ही रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे.
त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाने परिपत्रक काढले आहे. काही महाविद्यालये ही रक्कम देत नसल्याचे निदर्शनास आले आहे. ही रक्कम परत करण्याबाबतची माहिती विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून द्यावे. त्यानंतर ही रक्कम परत करण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे विद्यापीठाने बजावले आहे.
शासनानेही मागणी केलेल्या विद्यार्थ्यांना ही रक्कम देणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शासनाने दिलेल्या आदेशाची काटेकोटपणे अंमलबजावणी करून, त्याचा अहवाल तत्काळ सहसंचालक विभागाकडे सादर करावा, असेही विद्यापीठाने सूचित केले आहे.