चौफेर न्यूज – राजकीय मंडळीसोबतच गडगंज संपत्ती असलेल्या बलाढ्य कुटुंबामध्येही कोण काय करेल याचा नियम राहिला नाही. आधी सोन्याच्या शर्टची चर्चा झाली. त्यानंतर कोरोना काळात सोन्याचा मास्क एकाने तयार केला. कित्येक ‘गोल्डन मॅन’ शहरात केवळ सोन्याच्या क्रेझमुळे नावारूपाला आले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात पहिल्यापासून सोनं हा प्रतिष्ठेचा विषय ठरला आहे. परंतु, आता थेरगावमधील एका कुटुंबाने मुलाच्या लग्नात चक्क सोन्याची पत्रिका तयार केली आहे. त्यामुळे या थाटामाटात होणाऱ्या शाही विवाह सोहळ्याची चर्चा सोशल मीडियावरच नव्हे तर शहरभर रंगली आहे.
सर्व पै-पाहुण्यांना लग्नाला आमंत्रित करायचं ही बारणे कुटुंबातल्या मंडळीची इच्छा होती. परंतु, कोरोनाने सर्व आनंदावर पाणी फिरवलं. छोटेखानी कार्यक्रमालाही शेकडो माणसांची थेरगावमध्ये यापूर्वी गर्दी होत असे. मात्र, सगळाच थाटमाट कोरोनाने हिरावला. पैसा असूनही कामी येईना अशी परिस्थिती झाली. म्हणून, लग्नाला काहीतरी हटके करावं असं मुलांच्या वडीलांना म्हणजेच नाना बारणे यांना सुचलं. त्यांचा लाडका मुलगा रोहितच्या लग्नासाठी त्यांनी सोन्याची पत्रिका करण्याचं ठरवलं. ‘लग्नाला गर्दी नसली म्हणून काय झालं. चर्चा तर होणारच.’ असा हा सोहळा कुटुंबीयांसाठी अविस्मरणीय ठरला आहे.
थेरगाव येथील नारायण नागुभाऊ बारणे यांचे ज्येष्ठ चिरंजीव रोहित बारणे यांचा विवाह सोहळा नांदेड सिटीतील जीवन भानुदास लगड यांची ज्येष्ठ कन्या वैष्णवी हिच्यासोबत होणार आहे. रोहित व वैष्णवी हे दोघे अभियंता आहेत. घरातील दोनशे मंडळीच्या उपस्थितीतच हा सोहळा पार पडणार आहे. मात्र, लग्नाला स्थानिक मंडळी व आप्तेष्टांची हजेरी नाही. सोशल डिस्टन्सचे नियम पाळणे गरजेचे आहे. यासाठी त्यांनी सोन्याची पत्रिका उरलेल्या खर्चात बनविण्याचे ठरविले. माया बारणे या त्यांच्या चुलती नगरसेविका आहेत. कुटुंबाचा राजकीय वारसा आहे. संतोष बारणे यांचा भाचा बंटी गुजर हा गोल्डन मॅन आहे.
छापील अक्षरे सोडल्यास पूर्ण पत्रिका सोन्याची आहे. ती ॲम्बॉस पेटींगमध्ये तयार केली असून प्रत्येकी अर्ध्या तोळ्याच्या पत्रिकेला ३० हजार रुपये इतका खर्च आला आहे. अशा २५ पत्रिका बारणे कुटुंबाने छापल्या आहेत. या पत्रिका आमदार, खासदार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात येणार आहेत. एक पत्रिका त्यांनी घरातील देवाच्या गाभाऱ्यात ठेवली आहे.
बऱ्याचदा लग्नातील पत्रिका फेकून दिल्या जातात. त्यामुळे त्याचे मूल्य शून्य होते. आमच्या कुटबियांची ही पत्रिका प्रत्येकाच्या घरात
व स्मरणात राहील अशी आहे. त्याची फ्रेम बनविल्यामुळे ती योग्य
पद्धतीने जतन केली जाईल. तसेच कोरोनामुळे या सोहळ्यावर आलेली
बंधने पाहता हा सोहळा
मोजक्या लोकांमध्ये झाला तरी तो अविस्मरणीय राहणार आहे.