चौफेर न्यूज – राज्यातील कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेत दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. मात्र, असे असताना देखील दहावी, बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे तर दहावीच्या परीक्षा 29 एप्रिल ते 20 मेदरम्यान होणार असल्याचे राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकात कोणताही दिव्यांग ,अपंग विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये. यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं परिपत्रक काढून राज्यातील सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना लेखनिक व वाचनिकाची सोय करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातील एकही दिव्यांग विद्यार्थी हा परीक्षेपासून वंचित राहणार नाही.
यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ अशोक भोसले यांनी या संदर्भातील आदेश काढून राज्यातील शाळांना सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्र राज्य व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीसाठी हे पत्र काढण्यात आले आहे. कोरोना माहामारीमुळे देशात अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
देशात तसेच राज्यात सर्व शाळा, महाविद्यालये बंद होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करता आला नाही. तसेच, तास न झाल्यामुळे शिक्षकांना पूर्ण अभ्यासक्रमही शिकवता आला नाही. हा विचार करुन राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने जुलै महिन्यात इयत्ता 10 आणि 12 वीच्या अभ्यासक्रमात 25 टक्के अभ्यासक्रम कपातीचा निर्णय घेतला होता.