चौफेर न्यूज – महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प आज म्हणजेच सोमवारी वित्तमंत्री अजित पवार विधानसभेत सादर करत आहे. कोरोनाकाळात सादर केला जात असलेल्या या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. अशात आज महिला दिनादिवशीच अर्थसंकल्पात मुलींसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. आता विद्यार्थिनींना एसटीच्या प्रवासासाठी पैसे खर्च करावे लागणार नाहीत. बसचा प्रवास आता मुलींसाठी मोफत उपलब्ध असणार आहे. ग्रामीण भागात आता मुलींना मोफत बस सेवा (Free Bus Service) पुरवली जाणार आहे. यामुळे आता बारावीपर्यंतच्या मुलींना मोफत बस सेवेचा लाभ घेता येणार आहे.
याशिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवांसाठी 7500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच सरकारी रुग्णालयांमध्ये आग रोधक उपकरणे लावण्यात येतील. तसंच सिंधुदूर्ग, उस्मानाबाद, रायगड, साताऱ्यात वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याची घोषणाही केली आहे.
कोरोना काळात औद्योगिक काळात घट झाली असली तरी बळीराजाने मात्र तारलं. त्यामुळे, शेतमालाचा व्यवहार पारदर्शी करण्यासाठी शासन प्रयत्नात असल्याचं पवारांनी सांगितलं. आता तीन लाख रुपये पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना आणि ज्यांनी हे कर्ज वेळेत भरले त्यांना शून्य़ टक्के व्याजदराने कर्ज मिळणार आहे. व्याज राज्य सरकार भरणार आहे. कर्जमुक्तीनंतर तब्बल ४२ हजार कोटी रुपयांचं पीक कर्ज शेतकऱ्यांना देण्यात आलं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. याशिवाय कृषी पंपाच्या सौरऊर्जा जोडणीसाठी १५०० कोटींचा महावितरणला निधी दिला जाणार. तसंच विकेल ते पिकेल योजनेसाठी २१०० कोटींची तरतूद आहे. कृषी संशोधनासाठी विद्यापीठांना दरवर्षी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.