चौफेर न्यूज – 2014 मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांच्या प्रमाणपत्राची मुदत मेअखेरपर्यंत संपत आहे. टीईटी परीक्षेत पात्र ठरूनही आतापर्यंत शिक्षकबंदीमुळे शिक्षकपदी नेमणूकच न झाल्याने या शिक्षकांवर पुन्हा एकदा संकट कोसळले असून टीईटी प्रमाणपत्राची मुदत वाढवून देण्याची मागणी करण्यात येत आहे.
शिक्षकपदी नियुक्तीसाठी एनसीईआरटीने टीईटी उत्तीर्ण होण्याची अट घातली होती. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून राज्यात 15 डिसेंबर 2013 रोजी पहिली टीईटी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत पहिल्या पेपरसाठी 3 लाख 83 हजार 630 तर दुसऱया पेपरसाठी 2 लाख 35 हजार 769 उमेदवार बसले होते. त्यात 31 हजार 72 उमेदवार उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण उमेदवारांना मे 2014 मध्ये प्रमाणपत्र देण्यात आले होते. या प्रमाणपत्राची पात्रता 7 वर्षे असून मे 2021 मध्ये ही पात्रता मुदत संपत आहे.
मात्र याच कालावधीत शिक्षण विभागाने 2013 पासून शिक्षक पदांच्या नियुक्तीवर बंदी घातली होती. यामुळे टीईटी उत्तीर्ण होऊनही शिक्षक पदांसाठी नेमणुकाच होऊ शकल्या नाहीत. त्यातच यंदा पात्रता प्रमाणपत्राची वैधताही संपुष्टात येणार असल्याने या टीईटी उत्तीर्ण उमेदवारांवर अन्याय होणार असल्याने यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी शिक्षक आमदार नागो गाणार तसेच शिक्षक परिषदेच्या वतीने कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्याकडे केली आहे.