चौफेर न्यूज – कोरोनाच्या संसर्गामुळे दहावीची परीक्षा रद्द केली असली तरी मूल्यमापनाबाबत विद्यार्थी, पालकांमध्ये संदिग्धता आहे. बारावी परीक्षा घेण्याबाबत शासनस्तरावरून निर्णय अद्याप झाला नसल्याने विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया रखडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी नवीन शैक्षणिक वर्षही लांबण्याची भीती निर्माण झाली आहे.
दहावीतील विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासंदर्भात अद्याप निर्णय नाही
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी नोव्हेंबरमध्ये दहावी, बारावीचे वर्ग सुरू झाले. दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल तर बारावीची परीक्षा 23 एप्रिलला सुरू होणार होती. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे दहावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला. कोल्हापूर विभागातील सुमारे 1 लाख 39 हजार विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. दहावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन जास्त व प्रत्यक्ष वर्गात शिक्षण कमी झाले. शिक्षण विभागाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असला तरी अद्याप विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करावे, याबाबत निर्णय झालेला नाही. यामुळे अकरावीसह आयटीआय, पॉलिटेक्निक आदी व्यवसाय अभ्यासक्रमांचे पुढील शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक कोलमडणार आहे.
बारावीच्या परीक्षेबाबत विद्यार्थी, पालक संभ—मात
कोरोना संसर्गामुळे बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला. कोल्हापूर विभागातून 1 लाख 22 हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. परीक्षेबाबतचा निर्णय जून महिन्यात होईल हे निश्चित नसल्याने विद्यार्थी, पालक संभ—मात आहेत. बारावीची परीक्षा झाल्यानंतर अभियांत्रिकी, वैद्यकीय व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू होतात. जूनमध्ये परीक्षा झाल्यास निकाल लागण्यास ऑगस्ट महिना उजाडण्याची शक्यता आहे. सर्व अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांचा निकाल त्यानंतर लागतो. त्यामुळे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) जाहीर केलेल्या शैक्षणिक कॅलेंडरनुसार 31 ऑगस्टला प्रवेशाची पहिली फेरी संपून 15 सप्टेंबरपर्यंत महाविद्यालये सुरू करणे अशक्य असल्याचे मत प्राचार्यांनी व्यक्त केले आहे.
अकरावी प्रवेशासाठी ‘सीईटी’ होणार?
दरवर्षी अकरावी प्रवेशासाठी नामांकित महाविद्यालयातील प्रवेशासाठी स्पर्धा असते. टक्केवारी मिळूनही विद्यार्थ्यांना अपेक्षित महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही. आयटीआय, पॉलिटेक्निक व इतर डिप्लोमा, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चांगल्या टक्केवारीची गरज भासणार आहे. दरम्यान, अकरावी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्याची चाचपणी शिक्षण विभागाकडून सुरू झाली आहे. राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेने ऑनलाईन सर्वेक्षण सुरू केले आहे. याच्या माध्यमातून विद्यार्थी, मुख्याध्यापकांचा कल जाणून घेतला जाणार आहे. त्यानंतरच सीईटीबाबत राज्य सरकारकडून अंतिम निर्णय होणार आहे.
कोणत्या परीक्षेचा अभ्यास करायचा?
बारावीची परीक्षा देऊन जेईई, सीईटी, नीट, या परीक्षांची विद्यार्थी तयारी करतात. बारावीची परीक्षा अद्याप न झाल्याने पुढच्या प्रवेश परीक्षांची तयारी करण्यावर बंधने येणार आहेत. नेमका कोणत्या परीक्षेचा अभ्यास करायचा, याबाबत विद्यार्थ्यांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. इंजिनिअरिंग, मेडिकल, आर्किटेक्चरच्या प्रवेशासाठी कस लागणार आहे.
15 जूनला नवीन शैक्षणिक सत्र सुरू होणार?
कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यार्ंंचे वार्षिक मूल्यमापन न करता पुढच्या वर्गात थेट प्रवेश देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. गेल्या वर्षाअखेरीस काही काळापुरते पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले होते. पहिली ते चौथीचे विद्यार्थी एक वर्ष संपले तरी अद्याप शाळेची पायरी चढले नाहीत. यंदाच्या वर्षी 15 जूनला नवीन शैक्षणिक सत्र सुरूहोणारअसल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. यावर्षीदेखील शाळा सुरू होतील की नाही? याबाबत साशंकता असल्याचे मुख्याध्यापक, शिक्षकांचे म्हणणे आहे.