चौफेर न्यूज – रद्द करण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 10 जुलै रोजी जाहीर केला जाणार आहे. गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने त्याविषयीचे वेळापत्रक तयार केले आहे. येत्या सोमवारी मान्यतेसाठी ते सरकारला सादर केले जाणार आहे. या दस्तावेजात शाळांनी विषयवार अंतर्गत गुण मंडळाकडे पाठवण्याची अंतिम तारीख 30 जून असेल तर प्रत्येक शाळेत मूल्यमापनासाठी सहा सदस्यीय समिती गठित करण्याची अंतिम तारीख 5 जून असेल असे नमूद करण्यात आले आहे. मंडळाकडून शाळांना मागील परीक्षांचे विषयवार व शैक्षणिक संस्थावार गुण पाठविण्याची अंतिम तारीख 12 जून तर मूल्यमापन समितीने तयार केलेल्या गुणपत्रक अपलोड करण्यासाठी पोर्टल खुला करण्याची तारीख 20 जून असेल असे मंडळाने म्हटले आहे.
मंडळाकडे गुणपत्रक 25 जूनपर्यंत सादर करावे, त्यानंतर 10 जुलै रोजी निकाल जाहीर केला जाईल, अशी माहिती या दस्तावेजात माहिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे शिक्षणमंत्री असल्याने त्यांच्याकडे ही माहिती मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे. मंडळाच्या पारंपारिक मूल्यमापन पद्धतीत प्रत्येक विषयासाठी 20 गुण संबंधित शाळांनी पाठवणे बंधनकारक आहे. व 80 गुणांची लेखी परिक्षा मंडळामार्फत घेण्यात येत होती. ते गुण पाठवण्याची अंतिम तारीख पूर्वी 15 मे होती. आता कोरोना महामारीचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेऊन मंडळाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्याने आता या अंतर्गत 20 गुणांबरोबरच विद्यार्थ्याच्या वर्षभरातील वेगवेगळ्या परिक्षांच्या आधारावर 80 गुणही पाठवण्याची जबाबदारी संबंधित शाळांवर आली आहे.
त्यासाठी प्रत्येक शाळेने दहावीला गणित,विज्ञान,समाज शास्त्र व तीन भाषा शिकविणाऱ्या सहा शिक्षकाची मूल्यमापन समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. या समितीवर शेजारच्या पण वेगळ्या शिक्षण संस्थेशी संलग्न असलेल्या व दहावीला शिकविणाऱ्या दोन शिक्षकांची स्वीकृत सदस्य म्हणून नेमणूक करणे गरजेचे आहे. त्याशिवाय गरज पडल्यास मंडळ या समितीवर खास दोन सदस्यांची नेमणूक करून देखरेख करण्याची तरतूद मसुद्यात ठेवली आहे. या समितीचा संबंधित शाळाप्रमुख प्रमुख राहणार आहे व तो सर्व कामकाजाला जबाबदार राहील असे मंडळाने यासंदर्भात केलेल्या दस्तावेजात म्हटले आहे.
समितीने मूल्यमापनानंतर शाळा प्रमुखांनी पाठविलेल्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर मंडळ निकाल तयार करेल. निकाल तयार करताना ज्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी क्रीडा गुणांची गरज असेल ते गुणही विचारत घेतले जातील. कुठलाही विद्यार्थी ते गुण देऊनही वरच्या वर्गात जाण्यासाठी पास होत नाही, त्याला “एटीकेटी” या प्रकारात घालण्यात येईल. त्या विद्यार्थ्याला अकरावीला प्रवेश घेता येईल. त्यानंतर त्याला पुरवणी परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागेल. जे विद्यार्थी निकालाबाबत समाधानी नाहीत, त्यांच्यासाठी पर्याय या मसुद्यात आहेत. मूल्यमापन समितीला कामासाठी मानधनाची सोयही या दस्तावेजात आहे. निकाल पारदर्शक करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे दस्तावेजात नमूद करण्यात आले आहे.
येत्या जुलैमध्ये अभ्यासक्रम व वेळेत काटछाट करून बारावीची परीक्षा घेण्याची सरकारची तयारी आहे. मात्र केंद्र सरकार याप्रकरणी निर्णय घेईपर्यंत राज्य सरकारने निर्णय घेणे लांबणीवर टाकले आहे.मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना आज याविषयी विचारले असता ते म्हणाले, बारावीची परीक्षा होईल. तशी कशी घ्यायची याची योजना तयार आहे. त्याला अंतिम रुप दिले आहे. गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ या प्रकरणी सरकारच्या संपर्कात आहे. मात्र जेईई, नीट आदी प्रवेश परीक्षांचा विषय आहे. त्या संदर्भात केंद्र सरकार काय निर्णय घेते याकडे सरकारचे लक्ष आहे. त्यांच्या निर्णयानंतर आम्ही आमचा निर्णय जाहीर करणार आहोत. मात्र बारावीची परीक्षा होणार आहे.





















