पिंपरी :- ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या बाळासाहेबांच्या विचारावर शिवसेना पक्ष उभा राहिला, याच विचारांच्या बांधिलकीवर मी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा शिवसैनिक झालो. भाजप बरोबर युती असल्याने कायम हिंदुत्व आणि विकासाच्या मुद्यावर लढणारी शिवसेना फक्त आणि फक्त सत्तेच्या आणि मुख्यमंत्री पदाच्या लालसे पोटी विरोधी पक्षा बरोबर घरोबा करण्याची चूक उद्धव ठाकरेंनी केली होती. शिवसेनेतील अनेक पदाधिकाऱ्याना हा निर्णय पटला नाही. सगळ्यांच्याच मनात नाराजी होती. राज्याचे मुख्यंमत्री शिवसेना पक्षाचे असून सुद्धा विकास निधी मिळत नव्हता. अनेक प्रलंबित कामे होत नव्हती. अनेक कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल होत होते.
उद्धव साहेब मुख्यंमत्री असून सुद्धा दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाला सगळ्यात अगोदर पाठिंबा देणाऱ्यांमध्ये सर्वात अगोदर नाव माझे होते. आज राज्यात भाजपा बरोबर युतीचे सरकार आहे. विकास कामासाठी निधी मिळत आहे. रखडलेली अनेक कामे मार्गी लागली आहेत. लवकरच शिरूर मतदार संघात महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे यासाठी उदयोग व्यवसायाचा आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे लोकसभेचे शिरूर माजी खासदार तथा उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने भोसरी विधानसभा मतदार संघात अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते पदाधिकाऱ्याना नियुक्ती पत्र देण्यात आले. कार्यकर्ता कसा असला पाहिजे, समाजकारण म्हणजे नेमके काय अशा अनेक विषयांवर त्यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.
सुशिक्षित तरुण राजकारणाकडे आकर्षित होत आहे हि देशाच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे. उच्च शिक्षित तरुणांच्या शिक्षण आणि नवीन कौशल्याचा फायदा देशाला आणि देशातील नागरिकांना नक्कीच होऊ शकतो. मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून आणि सगळे त्यांच्या पाठीशी उभे राहिलो राज्यातील तरुण पिढी देखील त्याच्या पाठीशी आहे. पक्षाला मिळालेले चिन्ह आणि नाव कायदेशीर रित्या योग्य आहे. राज्यात शिवसेना आणि भाजपा युतीचे सरकार असल्याने रखडलेल्या अनेक विकासकामांसाठी निधी मिळत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपल्या विभागात कुठलेही विकास कामे असतील तर त्यासाठी लागणार निधी नक्कीच सरकार कडून मिळवून देण्याचे काम करण्याचे आश्वासन देखील त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.
उपनेते तथा कामगार नेते इरफानभाई सय्यद यांनी देखील शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. सुख आणि आनंदात सगळेच सहभागी होतात परंतु दुःखात आधाराची गरज असते. व्यक्ती कोण आहे यापेक्षा माझी माणुसकी काय आहे याकडे लक्ष दिले पाहिजे. पक्ष म्हणजे कुटुंब आहे, इथे प्रत्येकाचा आदर सन्मान केला जातो. प्रत्येकाच्या विचारांची सांगड घातली जाते. स्वर्गीय बाळासाहेब आणि धर्मवीर दिघे साहेबांच्या विचारांची शिदोरी आपल्याला मिळाली आहे. ती आपल्याला तेवत ठेवायची आहे. युवा पिढीचा संवाद आणि त्यांच्याकडे असलेले संघटन कौशल्य चांगले आहे. हेच तरुण पक्ष आणि संघटनेची ताकत असतात. शिवसेनेत नव्याने जाहीर प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी स्वागत आणि मार्गदर्शन केले. तसेच अनेक पदाधिकाऱ्यांना त्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रही देण्यात आले.
कार्यकर्त्यांचे शिवसेनेत जाहीर प्रवेश आणि नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यासाठी भोसरी विधासभा प्रमुख प्रा. दत्तात्रय भालेराव यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. त्यावेळी त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केलेल्या सर्व शिवसैनिकांचे स्वागत केले आणि पक्ष वाढीसाठी कार्यकर्त्यांनी कश्या पद्धतीने नियोजन केले पाहिजे यावर मार्गदर्शन केले. तसेच पुढील काळात पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेच्या निवडणूका होणार आहेत, त्यासाठी पक्षाची बांधणी कशी करता येईल यावर देखील चर्चा केली.
यावेळी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना संपर्कप्रमुख तथा उपनेते व खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, शिवसेना उपनेते इरफान भाई सय्यद, शिवसेना जिल्हाप्रमुख व पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य भगवान पोखरकर, भोसरी विधानसभा उपजिल्हाप्रमुख संभाजीराव शिरसाट, शिवसेना चाकण शहर प्रमुख अक्षय जाधव, युवा जिल्हाधिकारी धनंजय पठारे, भोसरी विधानसभा प्रमुख दत्तात्रय भालेराव, भोसरी महिला शहरप्रमुख मनीषा परांडे, महिला शहर संघटिका जान्हवी पवार, भोसरी विधानसभा उपशहर प्रमुख रामदास गाढवे, समन्व्यक विशाल लांडगे, किशोर सवाई तसेच मतदार संघातील विभाग प्रमुख व शाखाप्रमुख उपशाखा प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भोसरी विधानसभा प्रमुख प्रा.दत्तात्रय भालेराव यांनी तर जिल्हा युवा समन्व्यक सागर पचारणे यांनी आभार व्यक्त केले.