‘संवाद व्यावसायिकांशी’ उपक्रमांतर्गत आयुक्तांचा शहरातील हॉटेल व्यावसायिकांशी संवाद
पिंपरी: शहराच्या विकासामध्ये हॉटेल व्यावसायिकांचे मोठे योगदान आहे. या व्यवसायामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध होत असून पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांनी घनकचरा व्यवस्थापन अधिक परिणामकारकपणे राबवावे, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे. हॉटेलला शुद्ध पाण्याचा पाणीपुरवठा सुरळीतपणे करण्यात येईल. हॉटेलच्या परिसरात असलेल्या अतिक्रमणांवर निष्कासनाची कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले. ‘संवाद व्यावसायिकांशी’ या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयुक्त शेखर सिंह यांनी शहरातील हॉटेल व्यावसायिकांशी संवाद साधला.
मनपा स्थायी समिती सभागृहात झालेल्या बैठकीवेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, आरोग्य विभागाचे उपायुक्त अजय चारठणकर, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, रामदास तांबे, माहिती व जनसंपर्क विभागप्रमुख रविकिरण घोडके, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात यांच्यासह पिंपरी चिंचवड हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष पद्मनाथ शेट्टी, कार्याध्यक्ष गोविंद पानसरे, उपाध्यक्ष रमेश पाटके, उपाध्यक्ष विश्वनाथ शेट्टी, सचिव सतीश तेलंग, गिरीश शेट्टी, किरण सुवर्णा, शंकर चक्रवती, महापालिकेचे अधिकारी आणि पीसीएमसी स्मार्ट सारथी टीम उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कामकाज अधिक लोकाभिमुख व्हावे, यासाठी वेळोवेळी शहरातील विविध समाज घटकांशी संवाद साधला जातो. व्यावसायिक, उद्योजक हे शहराच्या विकासाला आकार देणारे महत्त्वपूर्ण घटक आहेत. त्यांच्या मनातील विविध विचार, प्रश्न जाणून घेणे हे शहराच्या विकासाचे नियोजन करताना महत्त्वाचे ठरते. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने शहरातील हॉटेल व्यावसायिकांच्या समवेत संवादात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्याक्रमध्ये हॉटेल व्यावसायिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन आयुक्तांना सादर केले. तसेच काही प्रश्न देखील उपस्थित केले. आयुक्त सिंह यांनी सदर प्रश्नांना उत्तरे देऊन उपस्थितांचे शंकानिरसन केले. हॉटेल व्यवसायामध्ये ट्रान्सजेन्डर समूहातील नागरिकांना सामावून घेऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव असोसिएशनच्या वतीने मांडण्यात आला. त्याला आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून हॉटेल व्यावसायिकांना शहराचा विकास, त्यासंदर्भात आपली भूमिका, विविध अडचणी इत्यादी विषयांवर आपले विचार व्यक्त करण्याची संधी मिळाली.