पिंपरी :- पिंपरी येथील संदीप वाघेरे युवामंचच्या वतीने आयोजित इयत्ता दहावी व बारावी च्या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ तसेच इयत्ता जुनिअर के.जी. ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप समारंभ उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी केलेल्या चमकदार कामगिरीचे सर्वच मान्यवरांनी भरभरून कौतुक केले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना जेष्ठ विचारवंत लोकमत संपादक श्री.संजय आवटे व तसेच यशदा पुणेचे डॉ.बबन जोगदंड यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी इयत्ता १० वीच्या गुणवंत विद्यार्थ्यामध्ये काव्या बाणेकर या विद्यार्थीनीस लॅपटॉप तसेच लुथ्रा ध्रुव व कांबळे आरजू यांना टॅब तसेच सान्वी गव्हाणे, सांची निकाळजे या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग तसेच इयत्ता १२ वीच्या मुलवानी वंशिका या विद्यार्थीनीस लॅपटॉप तसेच यादव भूमिका व माळी तनिशा यांना टॅब पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. तसेच इयत्ता ज्युनिअर केजी ते इयत्ता ८ वीच्या सुमारे ७५९ गरीब गरजू वियार्थ्याना मोफत शालेय साहित्य (वह्या कंपास) चे वाटप करण्यात आले.
गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी संदिप वाघेरे युवामंचच्या वतीने वर्षभरात होणाऱ्या विविध उपक्रमांची नगरसेवक संदिप वाघेरे यांनी दिली. पिंपरी व पिंपरी परीसरातील विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा यासाठी मी सदैव कसोशीने प्रयत्न करत असतो. याच बरोबर कला, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम घेवून परिसरातील विविध क्षेत्रातील प्रोत्साहन देण्याचे काम वर्षभर सुरु असते. याचबरोबर मागील 6 वर्षामध्ये जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून मी दिलेले वचन नाम्यातील सर्व कामे पूर्ण केल्याचा मला व माझ्या सहकार्यांना सार्थ अभिमान आहे. पिंपरी वाघेरे गाव ही माझी जन्मभूमी व कर्मभूमी आहे, तिच्या विकासासाठी व नागरिकांच्या सेवेसाठी मी सदैव कटिबद्ध आहे अशी भावना वाघेरे यांनी व्यक्त केली.
पालक आणि मुलांचं नातं हे मैत्रीपूर्ण असाव…
मुलांच्या भविष्याविषयी पालकांची काही स्वप्न असतात. मात्र, आपल्या मुलांचा कल कोणत्या विभागाकडे आहे. याची जाणीव पालकांनी ठेवायला हवी. मुलांचा कल ओळखून त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे. आई-वडिलांनी आपल्या मुलांची मैत्रीपूर्ण नाते तयार करावे लोकमतचे संपादक संजय आवटे म्हणाले. मुलांविषयी पालकांची स्वप्न असणं गैर नाही. परंतु आपले विचार त्यांच्यावर लादणे चुकीचे आहे. त्यांचा कल ओळखून प्रोत्साहन दिल्यास ते अधिक चांगल्या पद्धतीने आपले भविष्य घडवू शकतात. आकाशाला गवस नाही घालण्याचं सामर्थ्य मुलांनी ठेवायला हवं, तशी स्वप्ने पाहायला हवेत स्वप्नांच्या दृष्टीने वाटचाल करायला हवी. स्वप्न पाहिले नाही, तर आपण ध्येय आणि उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकणार नाही. यशस्वी होऊ शकणार नाही. तसेच आपल्या पालकांची असणारी स्वप्ने त्यांच्या अपेक्षा याही पूर्ण करण्याचा प्रयत्न मुलांनी करायला हवा. वडील आणि मुलगा आई आणि मुलगी यामध्ये मित्रत्वाचे नाते असायला हवे. अनाठाई धाक दाखवणे चुकीचे आहे. मुलांच्या मनात काय सुरू आहे. हे त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर करू शकेल त्यामुळे पालकांनी मुलांशी संवाद साधायला हवा, त्यांचे विचार जाणून घ्यायला हवेत.” असे मत प्रसिद्ध विचारवंत आणि लोकमतचे संपादक संजय आवटे यांनी व्यक्त केले.
उज्वल भविष्यासाठी पंचसूत्रीचा वापर करा…
मुलांनी इयत्ता १० वी १२ च्या यशानंतर पुढील आयुष्यात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रभावी संवाद कौशल्य, जागतिक भाषांचे आकलन करणे, तंत्रज्ञानाबद्दल माहिती करून घेणे, आत्मविश्वास बाळगणे तसेच अपार मेहनत व कष्ट करण्याची तयारी ठेवणे या पंचसूत्रीचा अवलंब करावा असे मत यशदा पुणेचे डॉ.बबन जोगदंड यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कातळे यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आयोजन संदीप वाघेरे युवा मंचचे अध्यक्ष हरीश वाघेरे, सदस्य गणेश मंजाळ, सचिन वाघेरे, रंजना जाधव, पवन हिरवे, मयूर बोडगे, समीर वाघेरे, अपूर्वा खोचाडे, शितल पोतदार, दिपा काळे यांनी केले. कार्यक्रमास वस्ताद दत्तोबा नाणेकर, पवना बँकेचे संचालक शिवाजी वाघेरे, रामदास कुदळे, किसन कापसे, विजय जाचक, संदीप कापसे, शेखर अहिरराव आदी मान्यवर उपस्थित होते.