जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांचे आवाहन
जिल्ह्यात 33 मतदान केंद्र
जिल्ह्यात एकूण 33 मतदान केंद्र असून धुळे तालुक्यात 16, साक्री तालुक्यात 7, शिरपूर व शिंदखेडा तालुक्यात प्रत्येकी पाच मतदान केंद्रे आहेत, असे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी सांगितले.
25 हजार 422 मतदार
आयोगाच्या सूचनेनुसार मतदारांचे फोटो असतील. धुळे तालूक्यात 9472 पुरूष, 3954 महिला, एकूण 13424. साक्री तालूक्यात 4058 पुरूष , 1446 महिला, एकूण 5504, शिरपूर तालूक्यात 2558 पुरूष, 892 महिला,एकूण 3450. शिंदखेडा तालूक्यात 2364 पुरूष, 680 महिला,एकूण 3044 असे जिल्ह्यात पुरुष मतदारांची संख्या 18452, तर महिला मतदारांची संख्या 6970 एवढी आहे.
धुळे : भारत निवडणूक आयोगाने 4 जानेवारीपासून महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी दिले.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली त्यावेळी जिल्हाधिकारी पांढरपट्टे हे बोलत होते. यावेळी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पांढरपट्टे म्हणाले की, नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातून महाराष्ट्राच्या विधान परिषदेसाठी एक सदस्य निवडून द्यावयाचा असतो. विद्यमान सदस्यांची मुदत 5 डिसेंबर 2016 रोजी संपली आहे. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघात नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, जळगाव जिल्ह्याचा समावेश असून या निवडणुकीसाठी पदवीधर म्हणून मतदार नोंदणी केलेले नागरिक मतदार असतील. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त नाशिक यांनी 10 जानेवारी रोजी निवडणुकीची सूचना क्रमांक 1 जारी केली आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 17 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे तर अर्जांची छाननी दि. 18 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजेपासून करण्यात येईल. उमेदवारी अर्ज माघारीसाठी 20 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत आहे. मतदान प्रक्रीया दि. 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 दरम्यान राबविण्यात येईल. मतदारांनी त्यांचेकडील भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, आधार कार्ड, पारपत्र, वाहन परवाना, बँक पासबुक, कार्यालयप्रमुखाकडून जारी करण्यात आलेले ओळखपत्र इत्यादीचा ओळखीचा पुरावा म्हणून मतदान अधिकाऱ्यांकडे सादर करावयाचे आहे.
6 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 8 वाजेपासून नाशिक येथे मतमोजणी होईल. लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 चे कलम 76 अन्वये इतर निवडणुकांप्रमाणे विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनी दैनंदिन खर्चाचा हिशेब सादर करणेच्या तरतुदी लागू नाहीत.
तथापि, भारत निवडणूक आयोगाकडील 26 डिसेंबर 2016 रोजीच्या निर्देशानुसार मतदारांना प्रलोभने दाखविणे, काळ्या पैशांचा वापर अशी बाब आढळल्यास याबाबत कडक कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री.पांढरपट्टे यांनी सांगितले. विभागप्रमुखांनी सतर्क राहावे विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने विभागप्रमुखांनी सतर्क राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री.पांढरपट्टे यांनी दिले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी जे. आर. वळवी (निवडणूक), शुभांगी भारदे (रोहयो), उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ (धुळे), नितीन गावंडे (शिरपूर), उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. वळवी, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी एम. आर. वाडेकर उपस्थित होते. विधान परिषद निवडणुकीसाठी नियुक्त केंद्रीय निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी हे जिल्ह्यातील कोणत्याही भागास अचानकपणे भेट देवून भारत निवडणूक आयोगाच्या आदेशांची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही याची पाहणी करतील. पाहणी दरम्यान दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांविरुध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनियमान्वये कारवाई करण्यात येईल.
आचारसंहिता लागू झाल्याने तत्काळ कार्यवाही करुन खासगी अथवा सार्वजनिक मालमत्तेवर विना परवाना लावलेले पोस्टर, झेंडे, कापडी बॅनर, लिहिलेल्या घोषणा अथवा निवडणूक चिन्हे काढून टाकल्याबाबतचे प्रमाणपत्र सर्व संबंधित विभागप्रमुखांनी या कार्यालयास त्वरीत पाठवावे.
जिल्ह्यातील सर्व तहसीलदार आणि अपर तहसीलदार यांची सेक्टर ऑमिसर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. संबंधित कार्यक्षेत्रासाठी तहसीलदार आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी कार्यरत राहतील. आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी उपजिल्हाधिकारी श्रीमती भारदे (रोहयो) धुळे यांची नोडल ऑमिसर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.