मुंबई – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षामुळे आपल्या प्रतिमेला धक्का बसला असल्याने भाजपा डॅमेज कंट्रोल करत असून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची बदली होण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा यांची राज्यपालपदी नियुक्ती केली जाऊ शकते. राष्ट्रपती राजवट हटवून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिल्याने राज्यपाल टीकेचे धनी झाले होते.
कोण आहेत कलराज मिश्र ?
कलराज मिश्र यांना २२ जुलै रोजी हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्त करण्यात आलं होतं. उत्तर प्रदेशचे ज्येष्ठ नेते असणारे कलराज मिश्र राज्य आणि केंद्रीय मंत्रीपदी राहिले आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशात प्रदेशाध्यक्ष पद सांभाळलं असून, राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते.
भगतसिंह कोश्यारी यांनी पक्षपातीपणा केल्याचा काँग्रेसचा आरोप
भगतसिंह कोश्यारी यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री आणि राज्यसभेचं सदस्यपद भूषवलं आहे. काँग्रेसने कोश्यारी यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. काँग्रेस प्रवक्ता मनिष तिवारी यांनी टीका करताना म्हटलं होतं की, “सत्याचा विजय झाला आहे हा महत्त्वाचा मुद्दा नसून, राज्यपालांनी ज्याप्रकारे पक्षपातीपणा करत निर्णय घेतले आहेत त्याकडे सर्वोच्च न्यायालयाने पाहिलं पाहिजे. त्यांनी संविधान, नियम, कायदा, परंपरा कशाचीही चिंता केली नाही,”.
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या युक्तिवादादरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वकील कपिल सिब्बल यांनी राज्यपालांनी पक्षपातीपणा आणि दुर्भाग्यपूर्ण धोऱणं अवलंबल्याचा आरोप केला होता. न्यायालयाच्या निर्णयानंतर राष्ट्रपतींनी तात्काळ त्यांची बदली करावी असंही त्यांनी म्हटलं होतं.