मुंबई – ‘मी राष्ट्रवादीत होतो, आहे आणि राहणार’,अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. तसेच मला आता काहीही बोलायचे नाही. योग्य वेळ आली का मी बोलणार आहे, असे देखील ते पुढे म्हणाले आहेत. तसेच राष्ट्रवादीशी बंडखोरी करत भाजपाशी हातमिळवणी केल्याबद्दल त्यांना विचारण्यात आले असता त्यांनी आपण राष्ट्रवादीमध्येच असल्याचे देखील उत्तर दिले. विशेष म्हणजे त्यांनी प्रसारमाध्यमांवर नाराजी व्यक्त करत आपल्यासंबंधी अनेक चुकीच्या बातम्या देण्यात आल्याची खंत देखील बोलून दाखवली आहे.
अजित पवार परततील याचा विश्वास होता
‘आम्हाला अजित पवार पुन्हा एकदा राष्ट्रावादी कॉंग्रेसमध्ये परतणार हा विश्वास होता. जे काही घडले ते कशामुळे घडले? का घडले? हे माहित नाही. मात्र, मी हे ,सांगू शकतो की, अजित पवार आमचेच आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. ते परत येतील याचा विश्वास होता. त्याचप्रमाणे ते कुटुंबाचे एक सदस्य आहेत. ते परतल्याचा आनंद झालाच आहे. मात्र, त्यापेक्षाही अधिक आनंद हा ते राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून आनंद झाला, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.
उद्या घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ
राज्यातील सत्ता स्थापनेचा अखेर मंगळवारी तिढा सुटला. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्याने आता राज्यात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आपले बहुमत सिद्ध करत ‘महाविकास’आघाडीची सत्ता स्थापन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज राज्यातील नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडत असून आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात येत असल्याचे पक्षांच्या ,संयुक्त बैठकीत जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे नवे मुख्यमंत्री होणार असून गुरुवारी संध्याकाळी ६.४० मिनिटांने उद्धव ठाकरे शिवाजीपार्क येथे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.