Chaupher News
अतिशय रोमहर्षक ठरलेल्या सुपर ओव्हरमध्ये मुंबईकर रोहित शर्मानं खेचलेल्या दोन उत्तुंग षटकारांच्या जोरावर टीम इंडियानं न्युझीलंडच्या तोंडापर्यंत असलेला विजयाचा घास हिरावून घेतला. सुपर ओव्हरमध्ये पोहोचलेला विजय-पराभवाचा थरारात रोहित शर्मानं अविस्मरणीय खेळीच दर्शनं घडवलं आणि न्यूझीलंडविरूद्धची पाच सामन्याची टी-२० मालिका भारतानं ३-० नं खिशात घातली. मोक्याच्या क्षणी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन आणि रॉस टेलरला शामीने बाद केल्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडने भारताला दिलेलं १८ धावांचं आव्हान रोहितने खणखणीत षटकार मारत सहज पार केलं. केन विल्यम्सनने या सामन्यात झटपट ९५ धावांची खेळी केली. तर रोहितच्या दमदार फलंदाजीनं विल्यम्सनच्या ९५ धावांवर खेळीलाही विस्मृतीत ढकललं.
न्यूझीलंडला अखेरच्या षटकात ६ चेंडूत ९ धावांची गरज होती. तिसरा सामना न्यूझीलंडने जवळपास जिंकला होता. कारण केन विल्यम्सन आणि रॉस टेलर मैदानात होते. पण शामीने धारधार गोलंदाजी करत पहिल्यांदा विल्यम्सनला बाद केले. त्यानंतर अखेरच्या चेंडूवर एक धाव हवी असताना टेलरला बाद केले. २० षटकात दोन्ही संघांच्या समान धावा झाल्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. विल्यम्सनने ४८ चेंडूत ९५ धावांची दमदार खेळी केली तर मार्टिन गप्टिलने ३१ धावांची खेळी केली. विल्यम्सन-गप्टिलशिवाय एकाही न्यूझीलंडच्या फलंदाजाला धावा काढता आल्या नाही. टेलर, मुनरो आणि सँटरला लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. भारताकडून शार्दुल ठाकूर आणि शामीनं प्रत्येकी दोन दोन बळी घेतले. चहल आणि जाडेजाला प्रत्येकी एक एक बळी मिळाला.
दरम्यान, त्यापूर्वी सलामी फलंदाज रोहित शर्माचे अर्धशतक (६५) आणि कर्णधार विराट कोहली (३८) यांच्या खेळीच्या बळावर भारताने प्रथम फंलदाजी करताना निर्धारित २० षटकांत पाच बाद १७९ धावांपर्यंत मजल मारली होती. तिसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकल्यानंतर भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं. रोहित शर्मा आणि के. एल. राहुलने भारताला आक्रमक सुरूवात करून दिली. रोहित शर्मा-राहुलने ८९ धावांची भागिदारी केली. सलामीची जोडी फुटल्यानंतर भारताच्या ठराविक अंतराने विकेट पडल्या. शिवम दुबेला कोहलीनं तिसऱ्या स्थानावर बढती दिली. मात्र, याचा फायदा शिवमला घेता आला नाही.
रोहित शर्मा आणि शिवम दुबे लागोपाठ बाद झाल्यानंतर श्रेयस आणि विराटने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, श्रेयस मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. विराट कोहली आणि मनिष पांडेनं अखेरच्या काही षटकांमध्ये धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. पण विराट कोहलीही बाद झाला. विराट बाद झाल्यानंतर पांडे आणि जाडेजाने अखेरच्या षटकांत धावगती वाढवली.