Chaupher News
औरंगाबाद : औरंगाबाद शहराच नाव संभाजीनगर करण्याची मागणी मनसेने एकमेव आमदार राजू पाटील विधानसभेत करणार आहेत.
‘औरंगाबाद शहराचं नाव बदलण्यासाठी मनसे सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. आमदार राजू पाटील विधानसभेत तसा प्रस्ताव मांडतील’, अशी माहिती मनसे नेते अभिजीत पानसे यांनी दिली. हिंदूत्ववादी भूमिकेकडे झुकलेल्या मनसेने शिवसेनेची भूमिकाही हायजॅक करण्याच्या हालचाली सुरु केल्याचं दिसत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा आयोजित करण्यात आला आहे. दौऱ्याच्या नियोजनासाठी राजू पाटील आणि अभिजित पानसे औरंगाबाद शहरात कालच दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ‘संभाजीनगर’चा मुद्दा तीव्र होताना दिसत आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर महाविकास आघाडी केल्याने त्यांचं हिंदुत्व सौम्य झाल्याचा आरोप भाजपचे नेते करत आहेत. औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करावं, ही मागणी शिवसेनेने जवळपास 30 वर्षांपासून उचलून धरली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नामांतराचं स्वप्न पाहिलं होतं. आता भाजपनेही या मागणीवर जोर दिला आहे.