Chaupher News
मुंबई : ‘फाळणीमुळे सिंध प्रांत पाकिस्तानात गेला; परंतु सिंध आपला आहे, ही भावना प्रत्येक भारतीयाने, हिंदूने मनात बाळगली पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढीलाही सांगितली पाहिजे. सर्वाना एकत्र आणून आपले हरवलेले वैभव पुन्हा प्राप्त करता येते हे इस्राईलने दाखवून दिले आहे. सिंधमध्ये एक दिवस सिंधी हिंदू असतील. आपले हरवलेले परत मिळवण्याची जिद्द बाळगली पाहिजे,’ असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.
रोहित पुरी लिखित ‘राष्ट्राय नम:’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा राजपाल पुरी फाऊंडेशन आणि भारतीय सिंधू समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी भागवत बोलत होते. उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, राजपाल पुरी यांच्या पत्नी कमला पुरी, पुत्र व पुस्तकाचे लेखक रोहित पुरी आणि ललित पुरी, भारतीय सिंधू सभेचे अध्यक्ष लक्ष्मण चंदिरामानी उपस्थित होते.
भागवत म्हणाले, तब्बल १८०० वर्षे ज्यू समाजाने आपल्या मायभूमीत परतण्याची आकांक्षा जागृत ठेवली आणि ते त्यांनी करून दाखवले. फाळणीवेळी पाकिस्तानात गेलेला सिंध प्रांतदेखील आपलाच आहे. परंतु ही भावना भावी पिढीतही उतरली पाहिजे. आपले हरवलेले परत मिळवण्याची जिद्द मनी बाळगली पाहिजे. सिंधच्या एकत्रीकरणातून आपल्या पवित्र भारताला पुन्हा विश्वगुरूचे स्थान मिळेल.