Chaupher News
पुणे : सारथी संस्था व तारादूत प्रकल्प वाचला पाहिजे. या मागणीसाठी असंख्य कर्मचाऱ्यांनी पुण्यातील सारथी कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. त्यातील पाच कर्मचाऱ्यांची प्रकृती अचानक बिघडली आहे.
उपोषणकर्ते गणेश चव्हाण म्हणाले की, ‘छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण संशोधन आणि मानव विकास संशोधन अंतर्गत तारादूत प्रकल्प चालू आहे. या प्रकल्पामध्ये साधारण ३५० जण काम करतात. या सर्वांना तीन महिन्याचे मानधन मिळाले नाही. ते त्वरित मिळावे. तसेच प्रकल्पासाठी १५७ जणांच्या अद्याप नियुक्त्या झाल्या नाहीत. त्या करण्यात याव्या आणि या प्रकल्पासाठी सरकारने गती द्यावी. त्याचबरोबर ही सारथी संस्था राज्यातील मराठा समाजाच्या तरुणांसाठी काम करणारी आहे. या माध्यमातुन अनेक विद्यार्थ्यांना भविष्यात फायदा होणार आहे. मात्र मागील काही महिन्यात या संस्थेत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी झाली पाहिजे आणि सारथी संस्था वाचली पाहिजे. या सर्व मागण्यासाठी आम्ही बेमुदत उपोषणास बसलो आहोत. आतापर्यंत उपोषणाला बसलेल्या पाच कर्मचाऱ्यांची तब्येत बिघडली आहे. त्या सर्वांना रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहे. तसेच या उपोषणाची सरकारने तातडीने दखल घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.