चौफेर न्यूज – समाज माध्यमांवर सुरू असलेले आक्षेपार्ह लेखन आणि आणि त्यावर होणारी कारवाई सध्या चर्चेत असते. अशाच कारवाईला लक्ष्यात घेता ‘द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया’ने सनदी लेखापाल आणि सीए करणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचं लेखन करण्यावर बंदी घातली आहे.
विविध शासन निर्णय आणि शासकीय संस्थेबद्दल समाज माध्यमांवर लिहून वादंग निर्माण करणाऱ्या पोस्ट बऱ्याच वेळा दिसून येतात त्यामुळे, ‘आयसीएआय’ने देशातील सनदी लेखापाल आणि सीए करणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचं लेखन केल्यास शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याची तंबी दिली आहे.
काही सनदी लेखापाल यांचे समाजमाध्यमांवरचे लेखन हे आक्षेपार्ह आढळले असल्याने संबंधित निर्णय घेतला असल्याचं ‘आयसीएआय’ने स्पष्ट केलं आहे. अशा प्रकारच्या लेखनामुळे सामाजिक तेढ निर्माण होणं आणि नागरिकांमध्ये चुकीची माहिती पोहोचण्याची शक्यता असते. त्यामुळे आता यापुढे असे लिखाण कोणी केल्यास शिस्तभंगाची कारवाई करून संबंधितांची नोंदणी रद्द करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
या निर्णयातून कोणत्याही व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा हेतू नाही. समाज माध्यमांवर लिखाण करत असताना जबाबदारीने आणि अभ्यासपूर्ण लिखाण होणं गरचेचं असल्याचं आणि याआधीही कायद्यात अशा प्रकारच्या तरतुदी असल्याचं ‘आयसीएआय’चे माजी अध्यक्ष मंगेश किनरे यांनी सांगितलं आहे.