निजामपूर : मुलगी झाली म्हणून त्याकडे नकारात्मक भावनेने पाहुन ‘निराश’ होणारे लोक आपण पाहतो. मुलीच्या लग्नासाठी लागणारा खर्च, हुंडा आणि लग्न झाल्यावर सासरच्यांकडून मिळणारी वागणूक अशा अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने अनेक माता-पित्याची भुमिका याबाबत नकरात्मकच दिसून येते.
असे असले तरी मुलीच्या जन्माचे स्वागत करणारेही समाजात कमी नाही. साक्री तालुक्यातील जैताणे येथील बोरसे परिवाराने मात्र जन्मलेल्या तिळ्या मुलींचे बोरसे परिवाराने आनंदाने स्वागत केले. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीतर्फे मातेचा साडीचोळी देऊन गौरव करण्यात आला.
जैताणे येथील मोनाली रवींद्र बोरसे या मातेने दोंडाईचा येथील टोणगावकर हॉस्पीटलमध्ये 3 डिसेंबरला एकाचवेळी तीन कन्यारत्नांना जन्म दिला. बहिणीने तीन मुलींना जन्म दिल्याचे वृत्त समजताच निजामपूर ग्रामपंचायीतर्फे मोनाली बोरसे यांचा साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जैताणे ग्रामपंचायतीतर्फे आर्थिक मदत देण्यात आली.
सरपंच संजय खैरनार, उपसरपंच नानाभाऊ पगारे, शानाभाऊ बच्छाव, आबा भलकारे, गणेश देवरे, रघुवीर खारकर यांच्या उपस्थितीत 5100 रूपयांची मदत देण्यात आली. तसेच आश्रमशाळा शिक्षकांकडूनही मदत करण्यात आली.
यावेळी जैताणे येथील सरपंच संजय खैरनार, उपसरपंच नानाभाऊ पगार, निजामपूर येथील सरपंच अजित शाह, निजामपूर उपसरपंच रमेश आप्पा वाणी, शानाभाऊ बच्छाव, आबा भलकारे, गणेश देवरे, श्री. खारकर, जगदाळे, सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
यावेळी राकेश पगारे यांनी कन्यारत्नाचे महत्त्व सांगितले. मोनाली बोरसे यांचे पती रविंद्र तुकाराम बोरसे हे मोलमजुरी करतात. गरीब परिस्थितीतून ते आपल्या कुटूंबियांचा गाडा ओढत आहेत. संजयनगर येथील सामाजिक कार्यकर्ते रविंद्र न्याहळदे यांनी बोरसे कुटूंबाचा आनंद द्विगुणीत होण्यासाठी मदत केली आहे.