पिंपरी :- भारतातील प्रत्येक जिल्ह्यात बँकेची किमान एकतरी शाखा असावी, या उद्देशाने सध्या बँक ऑफ महाराष्ट्र काम करत आहे. आजच्या आधुनिक युगात ग्राहकांना तत्पर सेवा मिळाल्यास ग्राहक बँकेबरोबर जोडला जातो. त्यामुळेच स्वतः च्या विस्ताराच्या बरोबरीने ग्राहकाला जलदगतीने सेवा पुरविण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र कटिबद्ध आहे. असे आश्वासन बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक आशिष पांडे यांनी दिले.
बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने बँकेच्या ग्राहकांसाठी “ग्राहक संपर्क अभियान (Customer Outreach Program)” कार्यक्रमाचे आयोजन वाकड येथील एका हॉटेल मध्ये करण्यात आले होते. यावेळी बँकेचे सुमारे 200 पेक्षा जास्त ग्राहक उपस्थित होते. यावेळी सुमारे 70 कोटी रुपयांचे मंजूर केलेले कर्ज प्रस्तावांचे वितरण श्री पांडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बँक ऑफ महाराष्ट्राचे पुणे पश्चिम क्षेत्राचे क्षेत्रीय व्यवस्थापक राहुल वाघमारे, पुणे पूर्व विभागाचे क्षेत्रीय व्यवस्थापक डॉ. जावेद मोहनवी, पुणे शहर क्षेत्राचे क्षेत्रीय व्यवस्थापक राजेश सिंग आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना पुणे पश्चिम क्षेत्रीय कार्यालयाचे क्षत्रिय व्यवस्थापक राहुल वाघमारे यांनी तर आभारप्रदर्शन पुणे पश्चिम क्षत्रिय कार्यालयाच्या वसुली विभागाचे मुख्य व्यवस्थापक एच. आर. मीना यांनी केले.
२०२४ पर्यंत ५ लाख कोटींचा व्यवसाय करण्याची शक्यता..
चालू आर्थिक वर्षात बँक ऑफ महाराष्ट्र सुमारे ३.८० लाख कोटीपर्यंत व्यवसाय करणार आहे. त्यातच भारताच्या सुमारे १५० जिल्ह्यात बँकेच्या शाखा देखील स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्यामुळे पुढील २०२३-२४ या आर्थिक वर्षात बँक ऑफ महाराष्ट्र सुमारे ५ लाख कोटींचा व्यवसाय करू शकेल, अशी शक्यता बँकेचे कार्यकारी संचालक आशिष पांडे यांनी बोलताना व्यक्त केली.
एनपीएमध्ये घट हीच बँकेवरील विश्वासाची पावती..
अनेक बँका एनपीएमुळे चिंतेत असताना देखील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एनपीएमध्ये घट होत असल्याचे दिसून येत आहे. एनपीए घटल्याने बँकेचा ग्राहकांवर व ग्राहकांचा बँकवरील विश्वास मजबूत होण्यास मदत होत आहे, असे बँकेचे कार्यकारी संचालक आशिष पांडे यांनी प्रतिपादन केले.