जगातील सर्वोत्कृष्ट नौदलामध्ये भारतीय नौदलाचा समावेश होतो. भारताला लाभलेल्या प्रचंड सागरी किनाऱ्याचे अतिशय सक्षमरितीने नौदल संरक्षण करत असते. १२ वी नंतर नौदलाच्या वरिष्ठ श्रेणीच्या पदभरतीसाठी पुढील दोन पध्दतीचा अवलंब केला जातो.
- (१) नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी एक्झामिनेशन या परीक्षेव्दारे उमेदवारांची भरती केली जाते. ही परीक्षा संघ लोकसेवा आयोग (यूपीएसस्सी) मार्फत घेतली जाते.
- (२) भारतीय नौदलामार्फत १०+२ (बी.टेक) कॅडेट एन्ट्री स्किम (योजना) राबवली जाते. या योजनेमधून उमेदवारांची थेट निवड केली जाते. अशा प्रकारे निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरुपी नियुक्ती (कमिशन) दिली जाते. २०२३ सालातील अशा भरतीची प्रक्रिया २८ जानेवारी २०२३ पासून झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ फेब्रुवारी २०२३ आहे.
या योजनेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नॅव्हल ॲकॅडेमी, एजिमाला (केरळ) येथे चार वर्षाचे प्रशिक्षण दिले जाते. या उमेदवारांची (१) शैक्षणिक आणि (२) कार्यकारी आणि तांत्रिक शाखेसाठी निवड केली जाते. ही भरती दरवर्षी दोनदा केली जाते. यंदा कार्यकारी व तांत्रिक शाखेसाठी ३० जागा आणि शैक्षणिक शाखेसाठी ५ जागा आहेत.
प्रवेश प्रक्रिया…
या थेट भरतीसाठी उमेदवारांची प्राथमिक निवड, आयआयटी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जॉईंट एंट्रंन्स एक्झामिनेशन (जेईई) – मेन या परीक्षेतील गुणांच्या आधारावर आणि प्राधान्यक्रम (प्रिफरन्स) या बाबींचा आधारे केली जाते.
उपलब्ध जागा लक्षात घेऊन जेईई मेनमधील कटऑफ गुण नौदल भरती प्रकियेच्या अधिकाऱ्यांकडून निश्चित केले जातात. (उदा- एका जागेसाठी १० उमेदवारांची निवड करावयाचे धोरण ठरवल्यास ३५० विद्यार्थी मुलाखतीच्या टप्प्यासाठी निवडले जातील. या योजनेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांमधून ३५० जणांची गुणवत्ता यादी जेईई(मेन) मध्ये मिळालेल्या गुणांवर केली जाईल. त्यासाठी पर्सेंटाइलचे कटऑफ हे अर्ज केलेल्या एकूण उमदेवारांच्या संख्येच्या प्रमाणात राहील.)
पहिल्या प्रिफरंसमधील शाखा मिळाली नाही तर जागा उपलब्ध असल्यास उमेदवाराचा विचार दुसऱ्या शाखेसाठी केला जाऊ शकतो. उमेदवाराने केवळ एकच शाखा निवडल्यास, गुणवत्ता यादित येऊनही दुसऱ्या शाखेसाठी त्याचा विचार केला जात नाही. त्यामुळे दोन्ही शाखेसाठी प्राधान्यक्रम देणे आवश्यक आहे.
अर्हता…
या योजनेंतर्गत अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारास १२ वीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितात सरासरीने ७० टक्के आणि १२ वी किंवा दहावीत इंग्रजीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळणे आवश्यक ठरते. २ जानेवारी २००४ रोजी ते १ जुलै २००६ या कालावधीत जन्म झालेले पुरुष उमेदवार या योजनेंतर्गत अर्ज करु शकतात.
निवड प्रकिया…
प्राथमिक निवड यादितील उमेदवारांना एसएसबी (सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड-निवड सेवा मंडळा)च्या केंद्रांमध्ये मुलाखती/ चाळणी परीक्षेसाठी बोलावले जाते. मुलाखतीसाठी येण्याजाण्याचा थ्रीटायर वातानुकुलित तिकिटाचा खर्च दिला जातो. चाळणी परीक्षेचे दोन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात बुध्दिमत्ता चाचणी, चित्रांचे अवलोकन/ बोध, समूह चर्चा या बाबींचा समावेश असतो. या टप्प्यात अयशस्वी झालेल्या उमेदवारांना त्याच दिवशी परत पाठवले जाते. दुसऱ्या टप्प्याची चाळणी/मुलाखती चार दिवस चालतात. यामध्ये समूह चर्चा, मानसशास्त्रीय चाचणी आणि मुलाखतीचा समावेश असतो. यात यशस्वी झालेल्या उमदेवारांना वैद्यकीय चाचणीला सामोरे जावे लागते. ही चाचणी साधारणत: तीन ते पाच दिवस चालते. यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड, नौदलाच्या गरजेनुसार ॲप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग या चार वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी केली जाते. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीची बी.टेक पदवी प्रदान केली जाते. या काळातील संपूर्ण खर्च (प्रशिक्षण/पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्य/ कपडे/ भोजन) नौदलामार्फत केला जातो. अर्ज ऑनलाइनच करावा लागतो.
उमेदवारास प्रारंभ सबलेफ्टनंट म्हणून नियुक्ती दिली जाते. त्यानंतर तो लेफ्टनंट, लेफ्टनंट कमांडर, कॅप्टन, कमांडर, कॉमोडोर, रिअल ॲडमिरल, व्हाईस ॲडमिरल, डायरेक्टर जनरल आर्म्ड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेस, व्हाईस चिफ ऑफ नेव्हल स्टाफ, चिफ ऑफ नेव्हल स्टाफ या क्रमाने पदोन्नत होत राहतो. या शिवाय रजा प्रवास सवलत, आरोग्य विमा, जगभ्रमंतीची संधी, निवास व्यवस्था, पोषाख, अन्नधान्य, मनोरंजन सुविधा असे अनेक लाभही दिले जातात.