चलनतुटवड्याचा निषेध : केंद्र सरकारकडून दिशाभूल होत असल्याची टिका
* पदाधिकारी-कार्यकर्त्यांकडून आंदोलन * एटीएम केंद्राना हार घालनू केले पिंडदा * चलनतुटवड्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा
पुणे : केंद्र सरकारने नोटांबदीचा निर्णय घेतला. त्यानंतर देशभरातील शेतकरी आणि सर्वसामान्यांचे हाल झाले. प्रचंड चलनतुटवडा झाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था कोसळली. त्यामुळे शेतकर्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर आंदोलन केले. चलनतुटवड्याचा निषेध करण्यात आला. पुरेशा प्रमाणात चलन उपलब्ध करून देण्याची मागणी या वेळी करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनानुसार आंदोलन करण्यात आले. खासदार सुप्रिया सुळे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या आंदोलना दरम्यान रस्त्यावर उतरून केंद्र सरकारच्या मनमानी कारभारावर सडकून टीका केली.
बारामतीसह पुणे जिल्ह्यातही आंदोलन करण्यात आले. पुणे-सोलापूर महामार्ग, पुणे-मुंबई जुना महामार्ग, पुणे-सातारा महामार्ग, पुणे-नाशिक महामार्ग आदी मुख्य रस्त्यांवर आणि शहरांत ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आला. जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, हवेली, वेल्हे, भोर, पुरंदर, बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर या तालुक्यांसह पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्येही जोरदार आंदोलन करण्यात आले.
ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून चलनतुटवड्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. अनेक ठिकाणी बंद एटीएम केंद्रांना हार घालण्यात आले. काही ठिकाणी एटीएम केंद्राबाहेर पिंडदान करण्यात आले. चलनतुटवड्याची काही ठिकाणी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. जिल्ह्यातील महामार्ग रोखणार्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी या वेळी ताब्यात घेतले. खासदार सुप्रिया सुळे यांनाही ताब्यात घेण्यात आले होते. आपल्या विविध मागण्यांचे निवेदन पोलिस आणि संबंधितांकडे देण्यात आले.
खासदार सुप्रिया सुळे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वेळी केंद्र सरकारच्या चुकीच्या आणि फसव्या धोरणांवर टिका केली. केंद्र सरकार चुकीचे आणि फसवे निर्णय घेत आहे. यातून सर्वसामान्यांची दिशाभूल करण्यात येत आहे. बँकांतील रांगा कायम आहेत. या रांगांमध्ये काही जणांचा मृत्यू झाला. त्याला जबाबदार कोण, असा सवालही सुळे यांनी या वेळी उपस्थित केला.