पुणे : समाजात आपण नेहमीच पाहतो की, हुंड्यापायी वधूला नानाप्रकारे सासरच्या लोकांकडून छळले जाते. अनेकदा नवविवाहितेला हुंड्याच्या पैशापायी जीवानिशी जावे लागण्याच्या घटना समाजात आपण नेहमीच ऐकत असतो. परंतु बारामतीतील प्रताप विठ्ठल आटोळे या युवकाने समाजासमोर एक आगळा वेगळा आदर्श घालून दिला आहे.
नववर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच 5 जानेवारी 2017 रोजी प्रताप आटोळे या युवकाने बारामती तालुक्यात असणार्या मेडद गावातील सीमा पानगे या अनाथ मुलीशी लग्न करुन समाजाच्या डोळ्यात अंजन घालून, एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
आयुष्याच्या जडण-घडणीत आई-वडिलांचे महत्त्व आणि प्रेम मिळते, त्या वयात सीमा आणि तिच्या बहिणीचे मातृपितृ छत्र हारपले, आणि दुःखाचा डोंगर या दोन्ही बहिणीवर कोसळला. परंतु अशाही परिस्थितीत कोणावरही अवलंबून न राहता. स्वावलंबी राहून या दोन्ही बहिणींनी हिंमतीने शिक्षण पूर्ण केले. आज या दोघीही स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. प्रताप आटोळे यांनी अगदी साध्या पध्दतीने लग्न करण्याचा निर्णय घेऊन, घरामध्ये असणारा राजकीय वारसा आणि पाटीलकीला तिलांजली देऊन, कोणत्याही प्रकारचा गाजाबाजा न करता, लग्नात होणार्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन, सोनगाव येथील ऐतिहासिक मंदिरात सोनेश्वराच्या साक्षीने प्रताप आणि सीमा यांनी विवाह करून समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.