Chaupher News
दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशच्या संघाने भारतावर मात करत आपलं पहिलं विजेतेपद पटकावलं. मात्र सामन्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये झालेल्या हमरीतुमरीमुळे बांगलादेशच्या विजयाला वेगळ वळण मिळालं.
सामन्यात बाजी मारल्यानंतर बांगलादेशच्या सर्व खेळाडूंनी मैदानात येऊन जल्लोषाला सुरुवात केली. यादरम्यान बांगलादेशच्या संघातील एका राखीव खेळाडूने भारतीय खेळाडूकडे पाहत काही आक्षेपार्ह वक्तव्य केलं…यावर भारतीय खेळाडूंनीही बांगलादेशी खेळाडूला प्रत्युत्तर दिलं. ज्यामुळे काहीकाळ मैदानात दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जुंपलेली पहायला मिळाली. दोन्ही पंचांनी वेळेत हस्तक्षेप केल्यामुळे हा वाद फारसा लांबला नाही. आयसीसीनेही या घटनेची दखल घेतली असून व्हिडीओ फुटेज तपासल्यानंतर योग्य कारवाई केली जाणार असल्याचं आश्वासक सामनाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेलं आहे.
“मैदानात नेमकं काय घडलं आम्हाला खरंच कळलं नाही. आम्हा सर्वांना धक्का बसला होता. आयसीसीचे अधिकारी त्या घटनेचं व्हिडीओ फुटेज पाहून पुढील कारवाईबद्दल निर्णय घेणार आहेत. सामनाधिकाऱ्यांनी माझ्याकडे येऊन घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. आयसीसी याविरोधात कडक कारवाई करेलं असंही आश्वासन मला मिळालेलं आहे.” भारतीय संघाचे व्यवस्थापक अनिल पटेल यांनी Espncricinfo संकेतस्थळाशी बोलताना सांगितलं.