Chaupher News
पुणे : गोरगरिबांच्या मनात हे माझे सरकार आहे, अशी भावना निर्माण झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी शासन कटिबध्द राहील, असा विश्वास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला. सनई-चौघड्यांचे मंजूळ स्वर, तुतारींच्या गगनभेदी गर्जना, ढोल-ताशांचा निनाद, भगव्या पताका, ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’चा जयघोष अशा आनंदमयी वातावरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव शिवनेरीवर उत्साहात साजरा झाला. याच प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमाला इतर मंत्री, पदाधिकाऱ्यांसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
कार्यक्रमात उपस्थिती लावणाऱ्यांमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले, आमच्या प्रत्येकाच्या हृदयात शिवविचार आहे. जिजाऊ मां साहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे तेज, प्रेरणा पाठीशी राहू द्या. शिवनेरी आपले वैभव आहे. या वैभवाचा वारसा जतन करण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाच्या विकासाची दिशा दाखवली. या दिशेने सरकारचे काम सुरू आहे. शिवनेरी परिसराचा विकास आर्थिक तरतुदी अभावी प्रलंबित राहता कामा नये, याची दक्षता घेतली जात आहे. परिसरातील विकास कामांसाठी तातडीने 23 कोटी रुपये उपलब्ध करून दिले जातील, असेही त्यांनी सांगितले आहे. मराठा आरक्षणाच्यावेळी दाखल झालेले गुन्हे कायद्याच्या चौकटीत राहून मागे घेण्यासाठी प्रयत्न केले जातील. ज्या गुन्ह्यात शासकीय मालमत्ता किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले नाही, ते गुन्हे नियमांच्या अधीन राहून मागे घेतले जातील, असे अजित पवारांनी स्पष्ट केले.