पुणे : भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांमुळे मनसेला कसलाही फरक पडणार नाही किंवा फटकाही बसणार नाही. उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची काहींना सवय असते. इकडून तिकडे येणे-जाणे हे राजकारणात कायम चालणारी प्रक्रिया आहे. आमच्याही संपर्कात भाजपची नेते मंडळी आहे. अनेकांशी माझे बोलणे सुरू आहे. आगामी काळात मनसेमध्ये भाजपचे नेते आल्याचे चित्र पहायला मिळेल, असे विधान मनसे नेते माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी केले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी पालिका निवडणुकीसाठी स्थानिक नेत्यांवर भिस्त न ठेवता पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहराची जबाबदारी बाळा नांदगावकर यांच्यावर सोपवली आहे. यानंतर 10 ऑगस्टपासून आजवर नांदगावकर यांनी शहरातील विविध भागांमध्ये पक्षाच्या पदाधिकार्यांच्या बैठका आयोजित करून पक्ष बांधणीचा प्रयत्न केला. मनसेचे काही नगरसेवक भाजपमध्ये गेले या पार्श्वभूमिवर बाळा नांदगावकर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष बाबाराजे जाधवराव, प्रदेश उपाध्यक्ष बाळा शेडगे, रणजीत शिरोळे, शहराध्यक्ष हेमंत संभूस, नगरसेवक रविंद्र धंगेकर, अॅड. किशोर शिंदे, रुपाली पाटील, बाबू वागसकर उपस्थित होते.
नांदगावकर म्हणाले की, ज्यांना पक्ष सोडून इतर पक्षात जायचे आहे, त्यांनी खुशाल जावे, कोणी भाजपमध्ये प्रवेश केल्याने मनसेला कसलाही फरक पडणार नाही. राजकारणामध्ये प्रत्येक पक्षाच्या वाट्याला चढउतार येतात. काम करताना चुका होतातच. आमच्या पक्षाच्या नगरसेवकांकडून काम करताना, काही चुका झाल्या असल्यास पक्षाचा नेता म्हणून मी पुणेकरांची माफी मागतो. आगामी पालिका निवडणुकीत पुणेकरांनी संधी द्यावी, यापेक्षा चांगले काम करून दाखवू. आगामी निवडणुकीत शहरातील वाहतुक कोंडी, कचर्याचा प्रश्न यासारखे विविध मुद्दे घेऊन आम्ही पुणेकरांच्या समोर जाणार आहोत.
पाकीस्तानी कलाकारांसाठी आपण एवढी ओढाताण का करतोय, हेच लक्षात येत नाही. त्यांना विरोध करण्याच्या भूमिकेवरून आम्ही कदापी मागे हटणार नाही. या मुद्द्यावर कसलीही तडजोड केली जाणार नाही.
जानकरांनी भान ठेवायला हवे :
आपण राज्याचे मंत्री आहोत, मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आपण राज्याचे प्रतिनिधीत्व करत असतो, याचे भान जानकर यांनी सार्वजनीक व्यासपीठावर ठेवायला हवे. त्यांना मी फोन करून या गोष्टी कानावर घालणार होतो, पण त्यांचा फोन लागला नाही, असेही नांदगावकर म्हणाले.
आर्थिक निकषावरील आरक्षणास पाठिंबा :
कोणत्याही जाती धर्माचा विचार न करता, आर्थिक निकषावर आरक्षण देण्यास आमचा पाठींबा आहे. ईबूसीचीसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 6 लाख रुपये करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. यातील 60 टक्क्याची अट काढून सर्वांना शिक्षण आणि आरोग्य सुविधा मोफत देण्याचा प्रयत्न करायला हवा. राज्यात जाती-जातींचे मोर्चे निघत आहेत, हे चित्र दुदैवी आहे, असेही नांदगावकर म्हणाले.
मनसेचा मेळावा दिवाळीनंतर :
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण मधील मनसे लोकप्रतिनीधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यचे एक दिवसीय शिबीर 24 ऑक्टोबर लोणवळा येथे आयोजित केले आहे. या शिबीरात ज्येष्ठ पत्रकार भरतकुमार राऊत व जयप्रकाश काब्रा हे मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे 18 ऑक्टोबर रोजी राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यात आयोजित केलेला मेळावा रद्द करण्यात आला असून तो दिवाळीनंतर होणार आहे.