Chaupher News
देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे आणखी तीन रुग्ण आढळून आले आहेत. या तिघांच्याही चाचण्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे देशात संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३४ वर पोहोचली आहे.
याबाबत आरोग्य मंत्रालयाचे विशेष सचिव संजीव कुमार यांनी सांगितले, लडाखमध्ये आढळून आलेल्या दोन रुग्णांच्या चाचण्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. हे लोक इराणला जाऊन आले आहेत. तसेच तामिळनाडूतील रुग्ण ओमानला जाऊन आला आहे. सध्या या तीनही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, देशातील कोरोनाबाबतची बिघडत्या परिस्थिच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यामध्ये मोदींनी निर्देश दिले की, लवकरात लवकर कोरोना बाधितांसाठी स्वतंत्र उपचार केंद्र सुरु करावेत. त्याचबरोबर याचा प्रादुर्भाव वाढत असेल तर अतिदक्षता विभाग स्थापन करण्यात यावेत. त्याचबरोबर विमानतळं, रेल्वे स्थानकं आणि बंदरांवरील सीमांवरही तपासण्या कडक करण्यात याव्यात. याशिवाय इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्याबाबत तसेच आजारी असलेल्या लोकांसाठी अधिकच्या खाटा उपलब्ध करुन देण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली.
पश्चिम दिल्लीमध्ये कोरोनाबाधीत एका व्यक्तीच्या कुटुंबातील ७ सदस्यांसह ११ लोकांना त्यांच्या घरीच निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या एका अधिकऱ्याने शुक्रवारी सांगितले की, ही व्यक्ती थायलंडला जाऊन आली आहे. त्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निश्चित झाले. दिल्लीत सध्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३ वर पोहोचली आहे.