चौफेर न्यूज – करोनामुळे राज्य शासनाने महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. या निर्णयामुळे ‘कही खुशी, कही गम’ अशी अवस्था आहे. दरम्यान, काही मंडळींनी शासनाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
सीबीएसई, सीआयएससीई आणि महाराष्ट्र बोर्डाच्या इयता दहावी परीक्षाही रद्द केल्या. बारावीच्या परीक्षा घेण्यावर मात्र सर्वच बोर्ड ठाम आहेत. विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने दहावी, बारावीच्या परीक्षा महत्त्वाच्या असतात. यावरून विद्यार्थ्यांची गुणवत्ता समजून येण्यास मदत होते. दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या परिस्थितिजन्य निर्णयाचे अभाविप व इतरांनी स्वागतही केले.
तसेच, काहींनी नाराजीही व्यक्त केली. या निर्णयामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षक संभ्रमात आहेत व काही प्रश्नदेखील उपस्थित झाले आहेत. राज्य शासनाने या विविध प्रश्नांवर त्वरित आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे. बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु याबाबत वेळापत्रक जाहीर झालेले नाही. त्यामुळे या परीक्षेबाबतही संभ्रम आहे.