धुळे : केंद्र सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला. पण या निर्णयामुळे सर्वच क्षेत्रांतील व्यवहार ठप्प झाले आहेत. कृषी क्षेत्राला नोटबंदीच्या निर्णयामुळे सर्वाधिक फटका बसला आहे. सध्या रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी केली आहे; परंतु ऐन पेरणीच्या हंगामातच शेतकऱ्यांकडे पैशांचा तुटवडा असल्याने बियाणे आणि रासायनिक खते कशी खरेदी करायची, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.
जिल्ह्यात यंदा जेमतेमच पाऊस झाला; पण परतीच्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. परतीच्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला; तसेच जलसाठ्यांमधे वाढ झाली. या आशेवर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तरारी केली. आता थंडीही चांगली पडत आहे. एकंदरीत रब्बी हंगामाच्या पेरणीस पोषक वातावरण निर्माण झाले आहे. दिवाळीनंतर गहू, हरभरा पेरणी; तसेच लाल उन्हाळी कांदा लागवडीची लगबग सुरू आहे. बाजरी व मक्याचे पीक काढून मोकळ्या झालेल्या शेतात रब्बीची पेरणी करण्याची तयारी शेतकऱ्यांनी चालविली आहे. यामुळे रब्बी हंगामाच्या कामांना गती मिळाली आहे; परंतु केंद्र सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे रब्बी हंगामाच्या पेरणीत अडथळा आला आहे.
नोटबंदीमुळे शेतकऱ्यांची परवड होत आहे. शेतकऱ्यांकडे असलेल्या पाचशे व हजाराच्या नोटा चलनातून बाद झाल्याने चालत नाहीत. शिवार हातात अजून नवीन नोटा आल्या नाहीत. बँकेत नोटा बदलण्यासाठी जायचे म्हणजे तासनतास रांगेत उभे राहारचे यामुळे पूर्ण दिवस वाया जात आहेत. त्याचबरोबर बँकेतून केवळ साडेचार हजार रुपरेच बदलून मिळत आहेत. एवढ्या पैशात बियाणे व रासायनिक खते खरेदी करायची कशी, या विवंचनेत शेतकरी आहेत.
यामुळे गेल्या आठवड्यापासून रब्बीच्या पेरणीला ब्रेक लागला आहे. नुकत्याच रिझर्व बँकेने नव्याने घेतलेल्या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना आठवड्याला बँकेतून 25 हजार रुपये काढता येणार आहेत. या नवीन निर्णयानंतरही शेतकऱ्यांना बँकेत रांगा लावाव्याच लागणार आहेत.