Chaupher News
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केला होता. या हल्यात बालाकोट पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देण्यात आली होती. मात्र गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी संघटनेचा तळ बालाकोट तळ पुन्हा एकदा भारतावर हल्ला करण्यासाठी सक्रीय झाला आहे.
जैश-ए-मोहम्मदकडून पुलवामा येथे दहशतवादी हल्ला करण्यात आल्यानंतर भारताने प्रत्युत्तर देत एअर स्ट्राइक केला होता. यावेळी बालाकोटमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले होते. पुन्हा कधी भारतावर अशा पद्धतीने हल्ला होऊ नये यासाठीच पाकिस्तानला हा धडा शिकवण्यात आला होता. मसूद अझहरचा मुलगा युसूफ अझहर सध्या जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या असून भारतावर हल्ला करण्यासाठी २७ दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत आहे.
गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ पैकी आठ दहशतवादी पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील आहेत. त्यांना पंजाब, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील दहशतवादी प्रशिक्षण देत आहेत. आपलं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हे प्रशिक्षण या आठवड्यात पूर्ण होईल. यानंतर दहशतवादी भारतात घुसखोरी कऱण्याचा प्रयत्न करतील. भारताने जेव्हा एअर स्ट्राइक केला तेव्हा बालाकोटमध्ये ३०० दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात होतं असंही त्यांनी सांगितलं आहे.