Chaupher News
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाची स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीमधील निकालावर प्रतिक्रिया दिली असून अरविंद केजरीवाल यांचं अभिनंदन केलं आहे. शरद पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
दिल्लीत सत्तेत असलेल्या आम आदमी पार्टीला स्पष्ट बहुमत देत दिल्लीकरांनी सत्तेवर बसण्याचा कौल दिल्याचे प्राथमिक कलांमधून दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या भाजपानं ही निवडणूक प्रचंड प्रतिष्ठेची केली होती. राष्ट्रावाद विरूद्ध विकास अशी ही निवडणूक लढवली गेली. त्यात दिल्लीकरांनी विकासाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल सलग तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील हे जवळपास निश्चित आहे. या सर्वांमध्ये काँग्रेसची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.
शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “दिल्ली विधानसभा निवडणुकीत स्पष्ट विजय मिळवल्याबद्दल अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन”.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दिल्लीमधील निकालावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राने एका नव्या पायंड्याची सुरुवात केल्याचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे. अहंकारी लोकांना दिल्लीकरांनी नाकारलं आहे. अंहकाराला कोणीच समर्थन देऊ शकत नाही अशी टीकाही यावेळी त्यांनी केली.
दिल्लीत प्रचारासाठी भाजपाचे १२ मुख्यमंत्री गेले होते. महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्रीही तिथे गेले होते. काही पदाधिकारीही तिथे जाऊन बसले होते. याशिवाय केंद्रीय गृहमंत्री आमित शाहदेखील होते. मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रचारसभा घेतल्या. पण तरीही सर्वसामान्यांनी जो कौल दिला आहे त्याचा खूप आनंद आहे असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
“दिल्लीत सत्याचा विजय झाला आहे. अनेक लोकांना अहंकार, मोठा आत्मविश्वास होता पण तसं झालं नाही. महाराष्ट्रात सर्वात आधी भाजपाच्या विरोधात मतदार गेले. तसंच दिल्लीत झालं. महाराष्ट्रात ज्याची सुरुवात झाली त्यानंतर अनेक राज्यात भाजपाच्या विरोधातील कौल पाहिला. उत्तर प्रदेश, बंगालमधील निवडणूक भाजपासाठी महत्त्वाची आहे. तिथे काय होईल हे सांगू शकत नाही,” असं रोहित पवार यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी प्रादेशिक पक्षांनी एकत्र आलं पाहिजे असं आवाहन केलं.