Chaupher News
दिल्लीमध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा भोपळाही फोडता आलेला नाही. ७०पैकी तब्बल ६७ उमेदवारांचे चक्क डिपॉझिट जप्त झाले आहे. मुळातच काँग्रेस पक्षाने मेहनत घेतली नव्हती. दिल्लीच्या निकालानंतर काँग्रेस कार्यालयात शुकशुकाट दिसून येत होता. ते अपेक्षितही होते. दिल्लीमध्ये काँग्रेसने फारशी मेहनत घेतलीच नव्हती. सध्या देशभरात भाजप विरुद्ध बाकी सगळे असे चित्र आहे. दिल्लीत अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पार्टीने भाजप विरोधाची स्पेस भरून काढली आहे.
या निवडणुकीत काँग्रेसनं फारशी मेहनत घेतली नाही, यामुळेच. काँग्रेसनं केवळ नामधारी उमेदवार दिले. प्रभावी प्रचार केलाच नाही. भाजप आणि आपचे तमाम नेते दिल्ली पिंजून काढत असताना काँग्रेसचा एकही मोठा नेता प्रचारात दिसला नाही. दिल्लीत काँग्रेसकडे नेतृत्वासाठी एकही चेहरा नव्हता. राहुल गांधींच्या मोजक्याच सभा झाल्या. काँग्रेसला केजरीवालांच्या पायात पाय घालायचा नव्हता. काँग्रेसला मतं मिळाली असती ती काठवरचीच. त्यांनी आपचीच मतं खाल्ली असती आणि याचा थेट फायदा भाजपला झाला असता. आप भाजपला अंगावर घेत असताना मध्ये पडण्यात अर्थ नाही, अशीच काहीशी भूमिका पहिल्यापासून होती. निकालानंतर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया पुरेशा बोलक्या आहेत. दुसऱ्याच्या विजयामध्ये आपला विजय मानायचं हे धोरण पक्षासाठी फारसं फायदेशीर नाही.