Chaupher News
दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्यावरुन दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. या हिंसाचार प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी चिंता व्यक्त करत तातडीने लष्कराला तैनात करण्याची मागणी केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. दिल्लीची परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून पोलिसांना त्यावर नियंत्रण मिळवता येत नाही. त्यामुळे तातडीने दिल्लीत लष्कराला तैनात करा, अशी मागणी त्यांनी गृहमंत्र्यालयाकडे केली आहे.
अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, ‘मी पूर्ण रात्रभर नागरिकांशी संपर्क करत आहे. दिल्लीची परिस्थीती अत्यंत चिंताजनक आहे. सर्व प्रयत्न करूनही पोलिस परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकले नाहीत. तसंच ते लोकांचा आत्मविश्वास वाढवू शकले नाहीत. लष्कराला तातडीने बोलावून उर्वरित बाधित भागात कर्फ्यू लागू करावा’, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसंच, यासंदर्भात मी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, दिल्लीमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याचे समर्थन करणारे आणि विरोध करणारे आमने सामने आले आणि हिंसाचाराला सुरुवात झाली. या हिंसाचाराविरोधात आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २५० पेक्षा अधिक जण यामध्ये जखमी झाले आहेत. जखमींमध्ये जळपास ५६ पोलिसांचा समावेश आहे. दरम्यान घटनास्थळी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अजित डोवाल मध्यरात्री पोहोचले घटनास्थळी
दिल्लीत सुरु असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मंगळवारी रात्री उशिरा उत्तर-पूर्व दिल्लीत घटनास्थळावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर सीलमपूरमध्ये उत्तर-पूर्वचे डीसीपी वेद प्रकाश सुर्या यांच्या कार्यालयात बैठक घेतली. यावेळी दिल्लीचे पोलीस प्रमुख अमूल्य पटनायक त्यांच्यासोबत होते. डोवाल आणि अन्य अधिकाऱ्यांनी मौजपूर, जाफराबाद, गोकुलपुरी आणि भजनपुूरा येथे जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला. अजित डोवाल दिल्लीतील परिस्थितीवर अत्यंत बारीक लक्ष ठेऊन आहेत. दिल्लीतील या हिंसाचारावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार आणि दिल्ली प्रशासनामध्ये बैठकांचे सत्र सुरु आहे.