चौफेर न्यूज – लॉकडाउननंतर तब्बल दीड वर्षांनी आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले. यामुळे शैक्षणिक साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. लॉकडाउनमध्ये शंभर टक्के व्यवसाय ठप्प झाला होता. शाळा उघडल्याने 20 ते 30 टक्के खरेदी-विक्री होत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.
दरवर्षी जूनमध्ये शाळा, महाविद्यालये सुरू होत असल्याने एप्रिल मे महिन्यात विशेषतः शैक्षणिक साहित्य खरेदी विक्रीला जोर येत असतो. मात्र 22 मार्च 2020 रोजी कडक लॉकडाउन झाला अन् त्यापूर्वी व्यावसायिकांनी भरून ठेवलेला कोट्यवधी रुपयांचा माल गोदामामध्ये पडून होता.
जानेवारी 2021 मध्ये शासनाच्या आदेशानंतर काही प्रमाणात शाळा सुरू झाल्या. मात्र पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यास नकार दिला. मात्र अवघ्या आठ-दहा दिवसांत करोना बाधितांची संख्या वाढू लागल्याने हा निर्णय सरकारला माघारी घ्यावा लागला. यामुळे व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला संपूर्ण माल पडून होता.
लॉकडाऊनमध्ये सरकारने शिथिलता दिल्यानंतरही शालेय साहित्याच्या दुकानांमध्ये शुकशुकाट होता. केवळ आवश्यक असणाऱ्या पुस्तकांचीच विक्री होत होती. बॅग, टिफीन, वॉटर बॅग, आकर्षक कंपास, पाऊच, वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य पडून होते.
उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती झाली होती. आता अर्धे शैक्षणिक वर्ष संपल्याने तसेच जुने शैक्षणिक साहित्य असल्याने खरेदी 50 टक्के असणार असल्याचेही दुकानदारांनी सांगितले.